भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला समतेचा मंत्र दिला – डॉ. सतीश ससाणे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला समतेचा मंत्र दिला - डॉ. सतीश ससाणे
अहमदपूर (गोविंद काळे) : ज्ञानाचा अथांग सागर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वाला समता, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्याचा मूलमंत्र दिला, असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक तथा शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. ससाणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला नवीन दृष्टी देण्याचे कार्य केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान संधी व अधिकार तर दिलेच त्याचबरोबर कर्तव्याची जाणीव करून देणारी राज्यघटना दिली. शिक्षणाशिवाय जीवनाचा उद्धार नाही हे ओळखून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन शिक्षणामुळे परिवर्तन कसे घडते हे आपल्या व्यक्तिमत्वातून दाखवून दिले, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताने विश्वाला दिलेला महान रत्न आहे. ज्यांच्या परिश्रमामुळे व त्यागामुळे उपेक्षित, दीन -दलित आदिना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच सर्वांना मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला,असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी मानले. यावेळी डॉ. संतोष पाटील, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
