राज्यघटनेतून डॉ. आंबेडकरांनी व्यक्तींची प्रतिष्ठा वाढवली – रंगा राचूरे

उदगीर (एल.पी.उगीले)
राज्यघटनेतून डॉ. आंबेडकरांनी व्यक्तींची प्रतिष्ठा वाढवली असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रंगा राचूरे यांनी केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहानिमित्त म. फुले, राजर्षी शाहू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि आजचे वास्तव या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य प्रा. मनोहर पटवारी होते. मंचावर प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, समिती प्रमुख प्रा. डॉ. बी. एस. भुकतरे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे व प्रा. टी. एन. सगर यांची उपस्थिती होती. राचूरे पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही लोकांना अर्पण केलेले जगातील एकमेव उदाहरण असून तिचे रक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे. डॉ. आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असून विद्यार्थी गुणवान व गुणवंत झाले पाहिजेत. ज्ञानातून प्रश्न निर्माण झाले तरच संशोधन शक्य होते, जात सोडल्यासच परिवर्तन शक्य आहे, आणि राज्यघटनेतील तरतुदींबाबत जनजागृती करणे ही सुशिक्षित वर्गाची जबाबदारी आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. पटवारी यांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मस्के यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. आर. दहिफळे यांनी तर आभार प्रा. डॉ. एस. व्ही. भद्रशेट्टी यांनी मानले.