भाजी मार्केट मधील पोलीस मदत केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात

0
भाजी मार्केट मधील पोलीस मदत केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर शहर हे बाबरी मज्जिद प्रकरणाच्या वेळी झालेल्या दंगलीमुळे संवेदनशील शहर म्हणून पोलीस दप्तरी ओळखले जाते. त्यानंतर भाजी मार्केट परिसरात भाजी घेण्यासाठी गेलेल्या महिला आणि मुलीवर काही विकृत स्वरूपाचे भाजीविक्रेते टीका टिप्पणी करत असल्याच्याही तक्रारी सुरू झाल्या होत्या. याच दरम्यान शिवसेनेचे नेते ॲड. गुलाब पटवारी यांच्या कार वर देखील दगडफेक करण्याचा प्रकार या चौकात घडला होता. त्यामुळे उदगीर चे वातावरण गढूळ झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजी मार्केट परिसरात महिलांची, मुलींची छेड काढली जाऊ नये, म्हणून पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते.
नव्याचे नऊ दिवस म्हटल्याप्रमाणे हे पोलीस मदत केंद्र काही दिवस व्यवस्थित चालू राहिले. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळांची कमतरता या कारणाने हे पोलीस मदत केंद्र कुलूप बंदच राहत होते. त्यासंदर्भात ही ओरड झाल्यानंतर आता ते पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत मात्र दुर्दैवाने या मदत केंद्रात जाण्याचा रस्ताच आता शिल्लक राहिलेला नाही, असे म्हटले तर वावगे होणार नाही.या पोलीस मदत केंद्रावर भाजी विक्रेत्यांनी जणू ताबा केला असून, या चौकीला चारही बाजूने भाजी विक्रेत्यांनी ताब्यात घेतल्याचे चित्र नागरिकांना पाहावयास मिळत आहे. उदगीर शहरातील पत्तेवार चौक हा फार मोठा असून, या भागात प्रसिद्ध कापड लाईन आहे. या भागात कापडाचा व्यापार जोरदार चालत असतो. त्यामुळे कापड खरेदीसाठी महिला व पुरुषांची तोबा गर्दी दिसून येते. याच भागातील चारही रस्ते भाजी विक्रेत्यांनी आपल्या ताब्यात घेतले असून, या रोडवर चार चाकी गाडे लावून, भाजी विक्रीचा दररोज धंदा करतात. यामुळे नागरिकांना रहदारीला रस्ताच मिळत नाही.याबाबत वरिष्ठाकडे नागरिकांनी अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या. तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी बैठक घेऊन, या ठिकाणी रोडवर कोणीही भाजी विक्री करू नये, असे सांगितले होते. पोलीस प्रशासनाने सांगितल्यामुळे काही दिवस शिस्त लागली होती, मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या…… कालच्याच ताक कन्या चांगल्या…. या लोकोक्तीप्रमाणे पुन्हा त्या पोलीस मदत केंद्राच्या चौहूबाजूंनी हातगाडी वाल्यांनी आपापल्या जागा पकडून ठेवलेल्या असल्यामुळे त्या भागातून पुढे जाणे सुद्धा शक्य होत नाही इतकी गर्दी केलेली दिसून येते. जनतेच्या आणि महिला मुलींच्या संरक्षणासाठी म्हणून स्थापन केलेल्या पोलीस मदत केंद्रामध्ये आता चक्क भाजीपाला ठेवण्याचे साधन म्हणून भाजी विक्रेते वापरत आहेत.त्याच बरोबर आज पावेतो एकही कॉन्स्टेबल या चौकीत दिसून आलेला नाही. यामुळे या भागातील भाजीविक्रेत्यांची दादागिरी वाढलेली आहे. यावर प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी प्रशासन व शासनाने त्वरित लक्ष घालून, नागरिकांना न्याय द्यावा, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. यापुढे प्रशासन, शासन, नगरपरिषद, व पोलीस खाते काय निर्णय घेतील, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!