उदगीर येथील शासकीय दूध योजना प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी पुन्हा धडपड सुरू

उदगीर (एल.पी.उगिले) कधीकाळी उदगीरचे वैभव असलेल्या शासकीय दूध योजना व दूध भुकटी प्रकल्पाला राजकीय महत्त्वकांक्षेच्या अभावामुळे भंगार मध्ये विक्री करण्याचा निर्णय घेतला. निविदाही काढल्या गेल्या. मात्र उदगीरच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरु करावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन वर्षापासून शासकीय दूध योजना कृती समितीच्या वतीने वेगवेगळ्या नेत्यांना आणि सत्तेतील मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या 13 एकर हून अधिक मोक्याची जागा तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दिली होती. आता त्या जागेवर अनेकांचा डोळा असल्याने ही शासकीय दूध योजना बंद पडावी, आणि मग त्या जागेची योग्य विल्हेवाट लावावी. असा डाव काही जण खेळत असल्याची चर्चा आहे.
मध्यंतरी शासन दरबारातील काही पुढार्यांनी ही शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प खाजगी दूध डेअरीला देण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न केला मात्र दूध योजना कृती समितीच्या प्रयत्नाने तोही हाणून पाडला गेला. त्यानंतर शासकीय दूध योजनेची मशनरी भंगार आहे असे सांगून त्या मशिनरीचा विक्री करण्याच्या उद्देशाने निविदा काढण्यात आल्या. ज्यांची निविदा मंजूर झाली होती ते कोल्हापूरचे संबंधित खाजगी दूध डेरी वाले हे साहित्य घेऊन जाण्यासाठी आले असता कृती समितीने त्यांना थांबवले. त्यामुळे हा प्रकल्प मृत अवस्थेत का असेना परंतु शिल्लक आहे. अजूनही उदगीर करांना हा प्रकल्प पुन्हा पूर्ववत सुरू करावा, आणि शेकडो लोकांना हाताला काम मिळावे, रोजगार मिळावा, असे वाटते. त्या अपेक्षेपोटीच मागील दोन वर्षापासून दूध डेरी बचाव समितीच्या वतीने वेळोवेळी सरकारच्या प्रतिनिधी कडे मागणी करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्याची सुपुत्र अहमदपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी ना. बाबासाहेब पाटील यांच्यासोबत कृती समितीने भेट घेऊन आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारची भूमिका तसेच केंद्र सरकार व एनडीडीबी यांच्या माध्यमातून झालेल्या हालचालींचा आढावा कॅबिनेट मंत्री यांच्यासमोर लेखी स्वरूपात मांडला.काही दिवसां मध्ये मंत्री व स्थानिक प्रतिनिधी यांच्या माध्यमातून राज्य शासनासोबत बैठक करू असे आश्वासन ना बाबासाहेब पाटील यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. उदगीरच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प धूळ खात आहे. हे प्रकल्प सुरू होईपर्यंत कृती समिती सतत पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध राहील. असे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. ना बाबासाहेब पाटील यांना या अनुषंगाने भेटतांना कृती समितीचे मोतीलाल डोईजोडे, ॲड. नरेश सोनवणे, अहमद सरवर, शिवसेनेचे नेते चंद्रकांत टेंगेटोल, प्रा. एस एस पाटील, ओम गांजुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.