15 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीचा महामोर्चा

0
15 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीचा महामोर्चा

15 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीचा महामोर्चा

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. यासह विविध मागण्यांना शासन दरबारी मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने 15 फेब्रुवारी रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडी घटक पक्षातील स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे बसवराज पाटील नागराळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते रंगा राचुरे , जनता दल चे युवा नेते अजित शिंदे, काँग्रेस पक्षाचे नेते तथा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे, बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, आशिष पाटील राजूरकर, गजानन सताळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना उदगीर परिसरातील जनतेचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून उदगीर व जळकोट तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शून्य टक्के व्याजदराने वाढीव पीक कर्ज द्या, मागील दोन वर्षापासून उदगीर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला नाही, तो तात्काळ मंजूर करावा., स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव लागू करावा., महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीची कामे समाविष्ट करावीत, शेतकरी व शेतमजुरांसाठी पेन्शन योजना लागू करावी, शेतकऱ्यांसाठी बारा तास विद्युत पुरवठा दिवसा सुरू करावा. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ सर्व रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक हेळसांड आणि नुकसान थांबवावी. नोकर भरती करून बेरोजगारी कमी करावी. बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा. खाजगी कंपन्या मार्फत करण्यात येत असलेली नोकर भरती बंद करावी, जुनी पेन्शन योजना तात्काळ सुरू करावी. या प्रमुख मागण्या सोबतच स्थानिक पातळीवरील नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, महसूल विभागात गुंठेवारी च्या नावाखाली होणारी लूट थांबवावी, उदगीर तहसील व आरोग्य विभागात असलेली प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द कराव्यात. नगर परिषदेने आकारलेली जुलमी पाणीपट्टी व घरपट्टी वाढीवकर तात्काळ रद्द करावा. उदगीर येथील फुलेनगर, मुसा नगर, संजय नगर, गांधीनगर, अशोक नगर व इतर सर्व कबाले अधिकृत करून त्यांना घरकुल द्यावे. एम एस ई बी मार्फत आवरेज लाईट बिल देणे बंद करावे. आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढ करावे, उदगीर येथील सामान्य रुग्णालयामधील सुविधा पूर्ण ताकतीनिशी सुरू कराव्यात, शासकीय आरोग्य सेवा मोफत देण्यात याव्यात. उदगीर जिल्हा निर्माण करावा. उदगीर येथील शासकीय दूध योजना तात्काळ सुरू करावी, इत्यादी मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.
यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, गेली चार वर्ष मंत्र्यांसोबत तुम्ही होतात मग आताच त्या त्रुट्या का काढता? किंवा आत्ताच तुम्हाला तो भ्रष्टाचार दिसला का? या प्रश्नावर उत्तर देताना, “देर आये, दुरुस्त आये”, असे समजून आम्हाला समजून घ्या. अशा पद्धतीची विनंती संयोजकातील काही नेत्यांनी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!