रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज – शिवव्याख्याते डॉ. बब्रुवान मोरे
रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज - शिवव्याख्याते डॉ. बब्रुवान मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : जनता हीच आपली सर्व समजून प्रत्येक जनतेचे राज्य म्हणजे स्वराज्य संकल्पनेतून केवळ रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक शिवव्याख्याते डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की , अदमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सव-२०२४ या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. मोरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर ; विचारपिठावर आयक्यूएसी समन्वयक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी व डॉ संतोष पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. बब्रुवान मोरे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिवरायांची समाधी शोधून काढून त्यांची जयंती महाराष्ट्रात सुरू केली एवढेच नव्हे तर कुळवाडी भूषण ही मानाची उपाधी महाराजांना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेसाठी राज्य केले रयतेच्या काडीलाही हात लावायची त्यांच्या राज्यामध्ये बंदी होती. त्यांच्याच लोककल्याणकारी राज्य संकल्पनेच्या आधारे भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केले, आज पूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत आहे असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला नाही. मात्र प्रस्थापित मार्क्सवादी इतिहासकारांनी त्यांच्यावर अन्याय केला असून, खरे शिवचरित्र लिहिणे ही काळाची गरज असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला गरज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते हिंदी , तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि इंग्रजी विषयांच्या भित्तिपत्रकांचे प्रकाशनही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
