स्वस्त धान्याच्या अपहार प्रकरणी गोदामपाल व वाहतुक कंत्राटदारावर लगाम लावा – संजय राठोड
स्वस्त धान्याच्या अपहार प्रकरणी गोदामपाल व वाहतुक कंत्राटदारावर लगाम लावा - संजय राठोड
उदगीर(एल.पी.उगीले) : उदगीर तालुका गोदाम मधून वाटप होणारे धान्य शासनाने ठरवून दिलेल्या बारदानाचे वजन सोडून निव्वळ धान्य 50 किलो चा कट्टा असायला पाहिजे. परंतु त्यामध्ये प्रत्येक कट्ट्यात दोन ते तीन किलो धान्य कमी दिले जाते. तसेच दोन ते तीन कट्टेही कमी दिले जातात. तसेच वाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्यामधील वाटपावेळी दुकानदारास धान्य मोजून देणे हे वाहतूक कंत्रालदारास बंधनकारक असून देखील प्रत्येक वाहनांमध्ये वजन काट्याची व्यवस्था नियमाप्रमाणे असायला पाहिजे. परंतु वाहनात वजन काटा न ठेवल्यामुळे धान्य वजन न करता राशन दुकानांमध्ये उतरवले जाते. राशन दुकानदाराने वजन करून धान्य मागितल्यास तालुका पुरवठा अधिकारी, गोदामपाल यांच्यामार्फत दबाव आणून वाहतूक कंत्राटदारांनी द्यायची हमाली राशन दुकानदारास द्यायला भाग पडतात.
नियमाप्रमाणे वाहतूक कंत्राटदाराने वाहतुकीस उपयोगात आणायच्या वाहनावर “लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धत महाराष्ट्र शासन” असे ठळक अक्षरात वाहनावर लिहिणे आवश्यक असतानाही वाहतूक कंत्राटदाराच्या व नियंत्रणातील वाहनावर असे लिहिलेले दिसून येत नाही. करारनामा करतेवेळी कंत्राटदारांनी सादर केलेल्या मालकीच्या व नियंत्रणाखाली वाहनाची यादी कंत्राटदाराने वाहतुकी करिता जी वाहने चालू आहेत, या वाहनाच्या नोंदीची यादी तहसीलदार यांच्या कडे दिली असेल तर त्यानुसार चौकशी करून कारवाई करावी. कारण गोदामपाल, पुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने गोदामा मधील माल गोदामा मधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून विना नोंदी वाहनांमध्ये अनाधिकृतरित्या राशनचे धान्य भरून काळाबाजार करीत आहेत. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी केला आहे. अशा आशयाचे निवेदनही महसूल प्रशासनाला दिले आहे.
शासनाच्या नियमानुसार वाहतूक कंत्राटदाराच्या व नियंत्रणाखालील सर्व वाहनांना जी.पी.एस.असणे अनिवार्य आहे. परंतु अनेक गाड्यांना कंत्राटदारामार्फत जी.पी.एस. बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे जी.पी.एस. नसलेल्या वाहनावर कारवाई करावी, तसेच तहसील कार्यालयात कंत्राटदार व नियंत्रणाखाली असणाऱ्या वाहनाची यादी शासकीय गोदाम परिसरात दर्शनी फलकावर लिहावी. त्यामुळे कोणते वाहन अधिकृत आहे आणि कोणते वाहन अनधिकृत आहे, हे कळेल व त्यामुळे पारदर्शकता येईल. अनाधिकृत वाहन जर शासकीय गोदामात येत असेल तर गोदामपाल व वाहतूक कंत्राटदार यांच्यावर गुन्हा नोंद करावा. या सर्व बाबीचा तहसीलदार यांनी गांभीर्याने विचार करून वस्तुस्थितीची पडताळणी करून दोषीवर कडक कारवाई करावी. राशनचा होत असलेला अपहार रोखावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टिंग ऑपरेशन करून मनसे स्टाईल दोषींवर कारवाई करेल. अशा आशयाचा इशारा देणारे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, तालुका सचिव सुनील तोंडचिरकर, तालुका उपाध्यक्ष संग्राम केंद्र,शहर सचिव रोहित बोईनवाड ,विनोद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
