मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ लवकरच ग्राम स्तरावरूनच देण्यात येणार – उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ लवकरच ग्राम स्तरावरूनच देण्यात येणार - उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे
अहमदपूर (गोविंद काळे) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ वर्ष करण्यात आले असुन तालुक्यातील प्रत्येक गावात लवकरच ग्राम स्तरावरूनच या योजनेचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उप-जिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांनी दिली आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासन स्तरावरून हालचालींना वेग आला असुन या योजनेच्या अंबल बजावणीसाठी गावात ग्राम स्तरावरूनच या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयातुन लवकरच अधिसुचना काढण्यात येणार असुन योजनेचा कालावधी व लागणारे कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांनी प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे
१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
