श्रीकांत पाटील यांच्या प्रवेशामुळे महाविकास आघाडीला बळ – खा. डॉ. शिवाजी काळगे
श्रीकांत पाटील यांच्या प्रवेशामुळे महाविकास आघाडीला बळ - खा. डॉ. शिवाजी काळगे
उदगीर (एल. पी. उगिले) : तालुक्यातील युवा नेतृत्व श्रीकांत कल्याणराव पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अत्यंत सकारात्मक पद्धतीने संघटन कुशल नेतृत्वाचे उदाहरण दाखवत जी जी कामे केली, ती उल्लेखनीय आहेत. अशा कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटन मजबूत होत असते. याचा आदर्श इतर युवकांनी घ्यावा, आणि महाविकास आघाडीला बळकट करावे. असे विचार नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील एसपी फ्लेक्स येथे आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्या नंतर सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष तथा काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील, अजित पाटील राजूरकर, यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. काळगे म्हणाले की, युवकांनी प्रामाणिकपणे काम करून समाजवादी विचारधारा जोपासावी. उद्याच्या भावी पिढीचे भविष्य समाजवादी विचारधाराच घडउ शकेल. जातीयवाद आणि धर्मांधता यामुळे समाजाचे आणि देशाचे मोठे नुकसान होणार आहे. युवकांनी या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन प्राधान्याने कार्य करणे गरजेचे आहे.
श्रीकांत पाटील यांच्यासारख्या युवकांनी काँग्रेस पक्षातून कार्य करणे गरजेचे आहे. श्रीकांत पाटील यांनी अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर उमटवला आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. असेही गौरवोद्गार याप्रसंगी खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांनी काढले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार संपादक महेश महालिंग मठपती यांच्या वतीने ही खा. शिवाजीराव काळगे यांचा सत्कार करण्यात आला.
