शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा – मरलापल्ले
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा - मरलापल्ले
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन लोककल्याणाच्या विविध योजना, जनतेचे हित विचारात घेऊन जाहीर करत आहे. त्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणीव जपत काम करावे. असे आवाहन उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी केले आहे.
ते ग्रामपंचायत कार्यालय डोंगरशेळकी च्या वतीने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेचे मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, तलाठी दत्ता मोरे,चेअरमन हणमंत मुंडे,ग्रामसेवक उत्तम राठोड ,पोलीस पाटील भालचंद्र शेळके,श्रीकांत कांबळे,अविनाश बरुरे, राहुल पुंड,पवन शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब मरलापल्ले म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने सध्या महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”ही अत्यंत चांगली योजना सुरू केली आहे. त्या योजनेचा प्रचार, प्रसार आणि परिणामकारक प्रत्यक्ष योजना राबवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.
महिलांच्या सोबतच ज्येष्ठ नागरिकां साठी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने योजना सुरू करण्यात आली आहे. निवारा, अन्न, वैद्यकीय सेवा आणि मनोरंजनाच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधा पुरवून आणि सरकारी निमसरकारी यांच्या क्षमता वाढीसाठी सहाय्य प्रदान करून उत्पादक आणि सक्रिय वृद्धांना प्रोत्साहन देऊन वृद्ध व्यक्तींचे जीवनमान सुधारणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्या योजनेतील लाभार्थ्यांना देखील लाभ मिळाला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून माध्यम बनावे आणि सामाजिक जाण जोपासावे, महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी भूमिकेसोबतच उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकप्रिय क्रीडामंत्री ना. संजय बनसोडे यांनी केलेल्या विकास कामाची माहिती देखील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे कार्यकर्ता म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे असेही मरलापल्ले यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा कार्यकर्त्या, बचत गटाच्या प्रवर्तक महिला,लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
ग्रामपंचायत कार्यालय च्या वतीने सर्व महिलांना मोफत अर्ज देणार आहेत. तसेच यावेळी जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
