अहमदपूरात आठ दिवसांनंतर पाच मिनीट सूर्यदर्शन
अहमदपूरात आठ दिवसांनंतर पाच मिनीट सूर्यदर्शन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात मागील आठ दिवसापासून सतत पावसाची रिमझिम सुरू आहे. रिमझिम पडत असलेल्या पावसामुळे आठ दिवसापासुन सूर्यदर्शन नव्हते. आज सकाळी ८ वाजता पाचच मिनीटाकरीता सूर्यदर्शन झाले.
ऊन नसल्याने अनेक ठिकाणची पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. शेती पिकांना सततचा पावसाचा मोठा फटका बसत आहे. या पावसात कापसासह सोयाबीन, तूर ही पिके पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. विशेष म्हणजे मागील दोन दिवसात अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस पाऊस झाल्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बऱ्याच पेरण्या पूर्ण झालेले आहेत. योग्यवेळी पेरणी झाली, वातावरण देखील पोषक होते.मात्र मागील जवळपास एक महिन्यांपासुन तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यानंतर गेल्या आठ दिवसा पासून संततधार पाऊस सुरू आहे. या आठ दिवसात एकदाही सूर्यदर्शन झाले नव्हते मात्र आज शुक्रवारी सकाळी अहमदपूर येथे ८ वाजता सुर्यदर्शन झाले. ते ही पाच मिनीटाचेच होते. सुर्यदर्शन झाले त्यावेळी अहमदपूरचे पत्रकार विरेंद्र पवार यांच्या ‘मनोरमा’ बंगला येथे आदित्य विरेंद्र पवार ( वय ११ वर्ष ) यांनी त्याच्या किचनरूम मधुन सुर्याचे दर्शन होताच मोबाईल मध्ये फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.
