परिवहन महामंडळाच्या एसटीच्या धुरामुळे प्रदुषण, वाहतूक विभागाकडून कार्यवाही नाही
परिवहन महामंडळाच्या एसटीच्या धुरामुळे प्रदुषण, वाहतूक विभागाकडून कार्यवाही नाही
अहमदपूर (गोविंद काळे) : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमुळे प्रदूषण वाढत असून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत असून या बसची पीयूसीही केली जात नाही. या बस भंगारात काढून नवीन बस आणाव्यात, अशी मागणीही प्रवाशांकडून केली जात आहे.
अहमदपूर शहराचे दळणवळणाचे प्रमुख साधन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी असली तरी अनेक बस नादुरुस्त आहेत. त्यातून बसमधील अनेक आसने तुटलेली असतात. स्वच्छतेच्या बाबत तर फारच दुर्लक्ष होत आहे. बसची दुरुस्ती करून प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही येथील प्रवासी करीत आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे सरकारच्या वतीने प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण दुसरीकडे जिल्ह्यात धावणाऱ्या एसटीच्या काळ्या धुरांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने नागरिक हैराण होत आहेत. त्यातच अहमदपूर आगाराची अहमदपूर - लातूर बस क्र. MH20/BL/1613 हि धुराचे लोळ सोडत जात होती. वाहनचलाकांकडे पीयूसी नसेल, तर दंड केला जातो, पण दुसरीकडे धुराचे लोट बाहेर फेकून प्रदूषण करणाऱ्या एसटी- बसवर कारवाई करण्यात वाहतूक पोलिस काणाडोळा करत आहेत.
एसटी बस चालताना प्रचंड प्रमाणात धूराचे लोळ बाहेर पडून नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होतो. यामुळे आजारांना निमंत्रणच मिळत आहे.एसटी महामंडळाच्या बसमुळे हवेतील प्रदूषण वाढत आहे. शिवाय नागरिक आणि प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अशा एसटीवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिक करत आहेत.
