महात्मा फुले महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
महात्मा फुले महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : पंचवीस वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने तीन महिने चाललेल्या कारगिलच्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी डॉ. मारोती कसाब हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात कारगिल युद्धाची माहिती सांगून, देशासाठी प्राण पणाला लावून लढलेल्या भारतीय जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाचा गौरव केला. तसेच कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहिली. अध्यक्षीय समारोपात डॉ. डी.डी. चौधरी म्हणाले की, कारगिल युद्धातील भारतीय जवानांचे हौतात्म्य लक्षात ठेऊन प्रत्येक भारतीय नागरिकाने देशासाठी कार्य केले पाहिजे. देशाची एकता आणि अखंडता कायम राखून देशाला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ह.भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले.यावेळी डॉ. सतीश ससाणे, डॉ. ए. एस. मोरे, डॉ. संतोष पाटील, डॉ. दिगंबर माने, डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रशांत बिरादार, प्रा. प्रकाश गायकवाड, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
