साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक आणि दलितोद्धारासाठी जीवन समर्पित केले – कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक आणि दलितोद्धारासाठी जीवन समर्पित केले - कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले
लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक व दलितांच्या समृद्धीचे स्वप्न पाहून त्यांच्या उन्नती करिता आयुष्यभर प्रयत्न केले, असे प्रतिपादन भूगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कॅप्टन बाळासाहेब गोडबोले यांनी केले.
ते येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.
हा कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला. यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, डॉ. यशवंत वळवी, डॉ. मंतोष स्वामी, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. धोंडीबा भुरे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. डॉ. अश्विनी रोडे, प्रा. किसनाथ कुडके, प्रा. सरस्वती बोरगावकर, प्रा. गोविंद पवार, प्रा. शंकर भोसले, प्रा. मारुती माळी, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि संगीत विभागाच्यावतीने प्रा. गोविंद पवार व अजय शेलार यांनी गायलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी झाले. यावेळी संगीत व मराठी विभागाच्या वतीने ”अस्मिता” या भित्तीपत्रकाचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विशेषांकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. गोडबोले म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ विमोचक विचारांचे संस्कार होते. त्यांच्या साहित्यात कष्टकरी, दलित, उपेक्षित यांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडून समाजातला सामान्य माणूस हा त्यांचा नायक आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी प्रा. किसनाथ कुडके म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कृतिशील समाज सुधारक आणि विख्यात साहित्यिक होते. त्यांच्या लेखनाला कृतीची जोड असल्यामुळे समाजप्रबोधनासाठी त्यांचे साहित्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्यातील नायक गुलामगिरीच्या विरोधात दंड थोपटून उभा राहतो आणि संघर्षाला सामोरे जातो असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. रत्नाकर बेडगे, विद्यार्थिनी कु. शिवानी मुखडे यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि जीवन कार्य याचा पट उलगडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विश्वनाथ स्वामी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संतोष येंचेवाड, बालाजी होनराव, अजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
