माजी नगरसेवक विक्रांत विलास भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला

0
माजी नगरसेवक विक्रांत विलास भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला

माजी नगरसेवक विक्रांत विलास भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला

उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील एक उगवते नेतृत्व माजी नगरसेवक तथा कै. विलास भोसले मराठवाडा मित्र मंडळाचे संस्थापक विक्रांत उर्फ बंटी विलास भोसले यांच्यावर काही गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या बियर बार व परमिट रूमवर देखरेख करण्यासाठी ते गेले असता रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या संदर्भात त्यांनी उदगीर शहर पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
उदगीर शहर आणि परिसरात सध्या गुंडागर्दी आणि दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मद्यपींची संख्या वाढल्यामुळे अशा हाणामाऱ्या आणि दादागिरी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने अशा गावगुंडांना वेळीच पाबंद करणे गरजेचे आहे. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
युवा नेते विक्रांत उर्फ बंटी भोसले यांच्यावर यापूर्वीही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्यांच्या कारचे नुकसान करून कार मधील संरक्षणासाठी ठेवलेले हत्यारही चोरीस गेले होते. या संदर्भातही गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने नेमका तपास न झाल्यामुळे त्या गुन्हेगारांची हिंमत वाढली असावी अशी चर्चा सध्या चालू आहे.
पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाल्यामुळे परमिट रूम आणि बियर बार अशा ठिकाणी हे गाव गुंड जाऊन धिंगाणा घालत आहेत. कुठे दारू पिऊन बील न देण्याच्या कारणावरून तर कुठे वेटरला तू वेळेवर माझी ऑर्डर का घेतला नाहीस? अशा किरकोळ कारणावरून मारहाण केली जात आहे. काही दिवसापूर्वी पिंटू सुतार यांच्यावरही गंभीर स्वरूपाचा हल्ला झाला होता. तसेच ग्रामीण भागातही असे गुंडागर्दीचे प्रकार वाढले आहेत. त्यावरही अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
युवा नेते विक्रांत उर्फ बंटी भोसले हे सकारात्मक राजकारण करणारे असल्याने समाज घातक लोकांना ते त्रासदायक वाटतात, त्यामुळे तर असे हल्ले होत नसावेत ना? अशी ही शंका मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण मराठवाड्यात कै. विलास भोसले मराठवाडा मित्र मंडळ समाज हिताचे उपक्रम राबवते. असे असताना अशा युवा नेत्याला संपवण्याचा घाट कोण घातला? याचा तपास होणे गरजेचे आहे. जेणेकरून पुन्हा कोणत्या दुसऱ्या तरुणावर हल्ला होणार नाही, किंवा कोणी सुपारी बहाद्दर पुढे येणार नाही. अशीही चर्चा उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे.
गुंडागर्दीला गुंडागर्दीच्या रूपाने उत्तर देण्यापेक्षा न्याय प्रक्रियेला प्राधान्य देत विक्रांत भोसले यांनी पोलीस प्रशासनाकडे आपली फिर्याद नोंदवली आहे. पोलीस प्रशासन या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात ?याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!