यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती आवश्यक – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती आवश्यक - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
महात्मा फुले महाविद्यालयात ‘स्टुडंट मोबिलायझर प्रोग्राम’ संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : सध्याचा काळ स्पर्धेचा काळ असून, या काळामध्ये जीव घेण्या स्पर्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पहावयास मिळतात. परंतु आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करियर करायचे आहे, त्या क्षेत्रातील आपले ध्येय निश्चित केल्यास जीवनात यश प्राप्त होते, असे प्रतिपादन मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक, ललित लेखक, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए.सी. विभागांतर्गत घेण्यात आलेल्या ‘स्टुडन्ट मोबिलायझर प्रोग्राम ‘ अर्थात विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी किसान पीठावर मौलाना आझाद उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद येथील मोहम्मद वाजिद अली खान, मुख्याध्यापक एम.ए. कादरी व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईल व गुगलच्या नादी न लागता पुस्तकांना आपला मित्र बनवावे. जे ज्ञान पुस्तक वाचनातून मिळते ते आभासी माध्यमातून मिळत नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मोहम्मद वाजिद अली खान म्हणाले की, आपले आदर्श आई-वडील व गुरु आहेत, त्यांचं जीवन वाचायला शिका. जीवनात कुठलेही संकट आले तरी आपण त्या संकटावर मात करू शकतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निरंतर वाचन, लेखन आणि मनन -चिंतन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय .क्यू.ए .सी . समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी व आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
