राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ बुधवारी उदगीरात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' बुधवारी उदगीरात
आ.जयंत पाटील, खा.डॉ. अमोल कोल्हे, खा.सुप्रियाताई सुळे, डॉ.जितेंद्र आव्हाड,अनिल देशमुख, राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती.
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता उदगीर शहरात दाखल होत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, मेहबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून उदगीर शहरातील शिवाजी चौक परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे माजी आ. सुधाकर भालेराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
किल्ले शिवनेरी (जुन्नर) येथून शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्यात मार्गस्थ झालेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व डॉ. अमोल कोल्हे यांचे नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील सरकारचे महायुतीचे काळे कारनामे जनतेसमोर मांडत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीचे सरकार बदलण्याचे आवाहन केलं जात आहे.
राज्यात वाढत चाललेली बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, महिलावरील अन्याय, अत्याचार, मोठ्या प्रमाणात झालेली विविध परीक्षांमधील पेपरफुटी, अर्थसंकल्पीय विषमता, वाढता खर्च कमी वेतन प्रणाली, राज्यातील उद्योग प्रकल्प स्थलांतर, वाढते कर्ज संकट, आर्थिक विकासाची घसरण, सरकारी नोकऱ्यांचे संकट, सहकारी बँकांची दुर्दशा, प्रशासनातील मोठा भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग, दुष्काळाकडे दुर्लक्ष, कर्जमाफीचा फज्जा, साखर उद्योगावरील वाढते संकट, आयात निर्यात धोरणात सावळा गोंधळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, फसवी पिकविमा योजना, आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष, दलित समाजावरील वाढत्या अन्याय अत्याचार, आरक्षणाच्या नावाखाली राजकीय षडयंत्र, नमो महारोजगार मेळाव्याचा पर्दाफाश, रखडलेली नोकरभरती, फसवी अग्निपथ योजना, राज्यातील वाढती गुन्हेगारी, हिट अँड रन प्रकरणात वाढ, महापुरुषांचा मोठा अवमान, पायाभूत सुविधांच्या नावाखाली जनतेची फसवणूक, भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्ड देणाऱ्या कंपनीलाच महाराष्ट्रात मोठी कंत्राट, महिलांवरील वाढता अन्याय अत्याचार, स्वस्त गॅस सिलेंडरचे ढोंगी आश्वासन, सुविधांच्या नावाखाली आश्वासनांचा भोपळा, रुग्णालयातील वाढते मृत्यूकांड अशा अनेक गंभीर समस्यांना वाचा फोडण्यासाठी ही जन स्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर दौरा करत आहे. उदगीर शहरात जनस्वराज यात्रा दाखल झाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. झाकीर हुसेन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे भव्य मोटार सायकल रॅलीच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन जाहीर सभेला सुरुवात होणार आहे.
या पत्रकार परिषदेला उदगीर विधानसभेचे माजी आ. सुधाकर भालेराव, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, विधानसभा अध्यक्ष अजित पाटील, उदगीर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जळकोट तालुकाध्यक्ष नेमीचंद पाटील, उदगीर शहराध्यक्ष अजीम दायमी, प्रदेश युवक कार्याध्यक्ष चंदन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
