१६ ऑगस्टला “पिकविमा सत्याग्रह”, चेअरमन संघटनेचे निवेदन
१६ ऑगस्टला "पिकविमा सत्याग्रह", चेअरमन संघटनेचे निवेदन
उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या एक महिन्यापासून उदगीर तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन संघटनेची २०२३ खरीप हंगामतील सोयाबीन,तूर पिकासाठी विमा कंपनीने १००% पिकविमा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ही आग्रही मागणी राहिली आहे.

प्रशासनास निवेदन देऊनही आत्तापर्यंत कोणत्याच प्रकारे सरकार व विमा कंपनीने याबाबत सकारात्मक भूमिका मांडली नाही. त्यामुळे चेअरमन संघटनेने आता उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी आंदोलन करण्याची भूमिका आहे. त्या अनुषंगाने चेअरमन संघटनेच्या वतीने रीतसर महसूल प्रशासनाला निवेदन दिले आहे. सदरील निवेदनात त्यांनी मागण्या मांडल्या आहेत त्या अशा, प्रतिहेक्टरी मिळणारे ५००० रू सोयाबीन अर्थसहाय्य अनुदानसाठी ई-पीक पाहणी ही जाचक अट रद्द करणे, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप २०२३ चा पिकविमा देणे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करणे, शासकीय योजना मंजुरीसाठी दलाल शासकीय कार्यालयात वावरत आहेत त्यांचा वावर बंद करणे आदी मागण्यांसाठी संघटना दिनांक १६ ऑगस्ट, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे अहिंसेच्या मार्गाने “पिकविमा सत्याग्रह” आंदोलन करणार असुन शेतकऱ्यांप्रती सद्भावन असणारे तालुक्यातील सर्व आजी माजी खासदार, आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक मंडळ, सरपंच, चेअरमन, विविध संघटना यांनी या सत्याग्रहात सामील होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे, असेही आवाहन यावेळी चेअरमन संघटनेकडून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर करण्यात आले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात बस्वराज पाटील मलकापूरकर, रामराव पाटील, धोंडीबा डावळे, शिवाजी पाटील, कल्लप्पा पाटील, मन्मथ कोनमारे, सूर्यकांत उगिले, संगमेश्वर मिटकरी, विवेक जाधव आदी चेअरमन तसेच लक्ष्मण बतले, अलीम पाटील हे शेतकरी समर्थक उपस्थित होते.
