नवनवीन ज्ञानाचे उपयोजन हाच यशाचा मंत्र – प्रा. श्रीहरी वेदपाठक
नवनवीन
उदगीर (एल.पी.उगीले) : भावी डॉक्टरांनी अभ्यासाचा सराव एकाग्र चित्ताने करावा व आपण आपल्या ठरवलेल्या विषयात पारंगत झाले पाहिजे, तरच आपल्याला स्पर्धेत टिकून राहता येईल.काळाच्या प्रवाहानुसार जो स्वत:मध्ये बदल घडवून आणतो,नवनवीन ज्ञान समजून घेऊन त्याचे उपयोजन करायला तयार असतो,तोच आयुष्यात यशस्वी होतो,असे प्रतिपादन प्रा.श्रीहरी वेदपाठक यांनी केले.
बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि चॅरिटेबल हॉस्पिटल उदगीर येथे आयोजित कार्यक्रमात प्रा.वेदपाठक बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्ता पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.चंद्रकांत भद्रे होते.
प्रा.श्रीहरी वेदपाठक पुढे म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब जाधव व आ. बाबासाहेब पाटील यांच्या कुशल नियोजनाने व मार्गदर्शनाने धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाने आपली एक वेगळी परंपरा निर्माण केली आहे.त्यानुसार आपल्या समाजाचे आरोग्य जपण्याची जबाबदारी भावी डॉक्टर म्हणून आपल्या खांद्यावर आहे.त्यासाठी आपण आपल्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान संपादन करण्याची गरज आहे.आज आपण परिश्रम घेतले तर भविष्यात सुखाचे दिवस येऊ शकतात.त्यासाठी अहोरात्र कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ.दत्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची कौशल्ये संपादन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. प्रारंभी प्राचार्य डॉ.दत्ता पाटील यांनी दत्ताहरी होनराव व प्रा.भद्रे यांचा शाल आणि वृक्षाचे रोप देऊन सत्कार केला.सूत्रसंचालन डॉ.बिरादार यांनी केले डॉ.बनसोडे यांनी आभार मानले. यावेळी बी.ए.एम्.एस्. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
