स्त्री मुक्तीचे प्रणेते महात्मा बसवेश्वर : शि.भ.प. अनिता हैबतपुरे
उदगीर (एल.पी.उगीले): स्त्री मुक्तीसाठी महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात उभारलेल्या लढ्यामुळेच आज स्त्री सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी समाजातील जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठीचे केलेले कार्य अतुलनीय असल्याचे प्रतिपादन शि.भ.प. अनिता हैबतपुरे यांनी केले.
उदगीर वीरशैव समाजाच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८५ वा स्मृतिदिनानिमित्त आयोजित ९० वा वचन सप्ताहात दुसरे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती पाटील होत्या. यावेळी विचारपीठावर वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी आपले विचार व्यक्त करताना अनिता हैबतपुरे यांनी,महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये विचार स्वातंत्र्य व आपले मत व्यक्त करण्यासाठी विविध जातीतील शरण-शरणींना एकत्र जमवून अनुभव मंडपाची स्थापना केली. त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची बीजे रोवली.अनुभव मंडपाच्या माध्यमातून ७७० शरणांनी निर्माण केलेल्या वचनसाहित्यांचे मानवी जीवनात अनुकरण केल्यास जीवन समृद्ध होईल. असे सांगून महिलांनी स्त्री स्वातंत्र्याचा दुरुपयोग न होवू देता, समाजहित डोळ्यासमोर ठेवून महात्मा बसवेश्वर यांनी घालून दिलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करावे, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. स्वाती पाटील यांनी, अनुभव मंडपाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता प्रथमतः महात्मा बसवेश्वरांनी आणली. त्यामुळे स्त्री-पुरुष हे समान आहेत. दोघांचं महत्त्व तितकेच असल्याचे सांगून स्त्री आरोग्यासंबंधी बोलताना त्यांनी स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून उरलेलं शिळे अन्न किंवा बाजारातील फास्टफूड खाण्याचे टाळावे, जास्तीचे उपवास टाळावे, ताजे अन्न खाल्यास ती सदृढ राहील असे सांगितले.
प्रास्ताविक अँड. महेश मळगे यांनी केले. सुत्रसंचालन उत्तरा कलबुर्गे यांनी केले. आभार रविंद्र हसरगुंडे यांनी मानले. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
