गोसावी समाज युवा प्रतिष्ठानचा मेळावा स्वार्थाने प्रेरित कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रमोद बन यांचा इशारा
गोसावी समाज युवा प्रतिष्ठानचा मेळावा स्वार्थाने प्रेरित कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रमोद बन यांचा इशारा
लातूर (प्रतिनिधी) : मागील काही वर्षांपासून गोसावी समाजाच्या तथाकथित मंडळी समाजहिताचा ठेका आपल्याकडेच असल्याचे चित्र निर्माण करून समाजाच्या नावा आडून विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना बोलावून आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा उद्योग चालवला आहे. अशाच प्रकारे रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी समाजाच्या बॅनरखाली कार्यक्रम आयोजित केला असून, सर्व समाजबांधवांनी यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर सदरील कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराच लातूर दशनाम गोसावी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद बन यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही स्वयंघोषित, तथाकतित समाजहिताचा ठेका आपल्याकडेच असल्याचा भास निर्माण करून समाजाच्या बॅनरखाली विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलावून समाजाचे प्रश्न मांडण्याऐवजी त्यांच्याकडून स्वार्थ साधला जात आहे. वस्तुतः या मंडळीचा लातूर जिल्ह्याच्या तळागाळातील गोसावी समाज बांधवांचा कसलाही संबंध नाही. सदर तथाकथित स्वार्थी मंडळींनी समाजाचे ज्वलंत असलेल्या शैक्षणिक, आरोग्य, शासकीय पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी काहीएक योगदान नाही. त्याचबरोबर समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत ही मंडळी कधीही आपले तोंड उघडत नाहीत. यांची समाजाप्रती कसलीही निष्ठा नाही. या तथाकथित मंडळींचा समाजासाठी काहीच उपयोग नसल्याचा आरोप प्रमोद बन यांनी केला आहे.
गोसावी समाजाची सर्वात ज्वलंत समस्या असेलला दफन विधीसाठी जागाच नाही हे समाजाचे दुर्दैव असून, याबाबत आम्ही सातत्याने शासनाकडे, नेत्यांकडे पाठपुरावा करत आहोत. या प्रश्नावर मात्र ही मंडळी गप्प का ? असा संतप्त सवाल समाजातून विचारला जात आहे. समाजाच्या सुख-दुःखात कधीही हे सहभागी होत नाही. यांना समाजाशी काहीही देणेघेणे नाही. केवळ समाजाच्या भोळ्याभाबड्या बांधवांचा वापर करून आपला स्वार्थ साधायचा आहे. हे यातून दिसून येत असल्याचेही प्रमोद बन यांनी म्हटले आहे.
समाजाच्या नावाने असे गुणगौरव सोहळे, मेळावे आयोजित करून राजकीय नेत्यांना बोलावून सर्व समाज आपल्याच पाठिशी असल्याचे चित्र निर्माण करून आपल्याला हवा तो स्वार्थ साधायचा हाच या तथाकथित मंडळींचा उद्देश असून, यांना समाजाच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही, हा डाव आता समाजाने ओळखला असून २५ आॅगस्टच्या मेळाव्यावर संपूर्ण समाजाचा बहिष्कार असून हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. राजकीय प्रेरित असलेला हा कार्यक्रम आम्ही उधळून लावणार असल्याचा गर्भित इशाराच लातूर दशनाम गोसावी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद बन यांच्यासह धनराज गिरी, शहाजी गिरी, विशाल गिरी, विश्वजित गिरी, मनोज पुरी, महेश पुरी, संतोष गिरी, दत्ता गिरी, लक्ष्मण गिरी, दिगंबर गिरी, नाना परवत, रामेश्वर परवत, राजेंद्र महाजन आदींसह समाज बांधवांनी केले आहे.
