जिजामाता यांनी मातृत्व, शौर्य आणि नेतृत्वाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेत अमूल्य योगदान दिले – विनोद गुरमे
जिजामाता यांनी मातृत्व, शौर्य आणि नेतृत्वाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेत अमूल्य योगदान दिले - विनोद गुरमे
उदगीर ( एल.पी.उगीले) : येथील रेनबो प्रि.प्रायमरी. सी.ई.बी.एसी पब्लिक स्कूल, देगलूर रोड, उदगीर येथे माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.संत बंडी महाराज शिक्षण संस्थेचे सचिव विनोद गुरमे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेश भूषा परीधान करून यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
या नंतर विनोद गुरमे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेतील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जिजामाता या मातृत्व आणि प्रखर नेतृत्वाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. जिजामाता यांनी शिवाजी महाराजांना योग्य संस्कार, राष्ट्रप्रेम, आणि शौर्याची शिकवण दिली.
आजही जिजामाता यांचे विचार आणि कार्य प्रेरणादायक ठरतात. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी स्मारके उभारली गेली आहेत. शिक्षण, महिला सक्षमीकरण, आणि राष्ट्रप्रेम यासाठी जिजामाता यांचे जीवन आदर्श ठरले आहे. जिजामाता यांचे जीवन हे इतिहासाचा अभिमान असून, प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे आहे.
तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विषयी बोलताना विनोद गुरमे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचे योगदान भारतीय समाज, शिक्षा, संस्कृती आणि एकतेसाठी अनमोल आहे. त्यांचे विचार आजही विद्यार्थ्यांना प्रेरित करत आहेत. त्यांच्या जीवन आणि कार्यामुळे भारताला जागतिक स्तरावर मान मिळाला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली परगे यांनी तर आभार श्रीमती मिताली ढेगे यांनी मानले. या वेळी शाळेच्या प्राचार्या सौ.अनुराधा गुरमे व सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
