राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाज उभारणीचे कार्य उभे राहते – प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाज उभारणीचे कार्य उभे राहते - प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे
बामणी (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन स्वयंसेवकांना समाज उभारणीचे कार्य करण्यासाठी प्रेरित करते. या माध्यमातून श्रम संस्कार, मूल्य विचार ग्रामस्वछता, वृक्षारोपण चळवळ, अंधश्रध्दा निर्मूलन,आपत्ती व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास,व आर्थिक साक्षरता या विषयावर प्रबोधन करण्यास सहाय्य करते. यामुळे राष्ट्र उभारणी यांना लागणारे बळ प्राप्त होते. ‘युथ फाॅर माय भारत व युथ फॉर डिजीटल लिटरसी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी नवा समाज निर्माण करण्यासाठी कटीबद्ध व्हावे, समाजाबरोबर स्वतःचाही विकास करून घ्यावा. डिजीटलदृष्ट्या स्वतःला समृध्द व साक्षर करून घ्यावे. असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय उदगीरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे बामणी येथील शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांनी काढले. या प्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील अध्यक्षस्थानी होते. तर विचार मंचावर संस्थेचे सचिव पांडुरंग शिंदे, सहसचिव हिरागीर गिरी, सरपंच सौ.प्रभावती बिराजदार, राजकुमार बिराजदार,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटील,ग्रामसेवक संजीव गुरमे,मुख्याध्यापक पठाण हे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मांजरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वतःला अपडेट करावे, नाही तर आपण काळाच्या ओघात निरक्षर रहाल, असा सज्जड इशारा दिला. यावेळी राजकुमार बिराजदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी बामणी गावाच्या विकासाचा आढावा आपल्या विवेचनातून सादर केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो विभागाचे मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रो.डॉ.सुरेश शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन सहकार्यक्रमाधिकारी डॉ.ए.सी.आकडे यांनी तर आभार सहकार्यक्रमाधिकारी डॉ.एस.डी.निटुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप बिरादार,तुकाराम चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले. बामणी शाळेतील शिक्षक, कर्मचारी ,ग्रामपंचायत बामणीचे कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
