ग्रंथांची संगत ही संतांची संगत- धनंजय गुडसूरकर यांचे मत
ग्रंथांची संगत ही संतांची संगत- धनंजय गुडसूरकर यांचे मत
उदगीर (एल.पी.उगीले) : वाचन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने तथा ग्रंथ ग्रंथाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे, या उद्देशाने वाचन कट्टा या उपक्रमांतर्गत बोलताना धनंजय गुणसूरकर यांनी सांगितले की, ग्रंथांची संगती संतांच्या संगती सारखे आहे. ते
श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीरचा एन. एस. एस. विभाग व बाल शिवाजी वाचनालय होनाळी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन कट्टा’ या उपक्रमांतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’ हा बहारदार कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी बिरादार यांनी वाचनालय परिसरात कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. विठ्ठल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक धनंजय गुडसुरकर हे उपस्थित होते. धनंजय गुडसुरकर यांनी “वाचता वाचता वाचे “या विषयावर आपले विचार चर्चात्मक पद्धतीने व अनेक दाखले देत व्यक्त केले. विविध ग्रंथांचा उल्लेख करीत त्यांनी असे प्रतिपादन केले की, ग्रंथच आपल्या जीवनाला योग्य वळण देऊ शकतात .ग्रंथांची संगत ही संतांची संगत असल्यासारखे आहे. चिमुकल्या बालकांसाठी त्यांनी बहारदार असे कथाकथन केले तर महाविद्यालयीन शिबिरार्थी साठी मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांसाठीही साहित्यिक मेजवानी दिली.
अध्यक्षीय समारोप करताना रा. से. यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.विठ्ठल गोरे यांनी संयोजक श्री शिवाजी बिरादार यांच्या कार्याचा गौरव केला व असे प्रतिपादन केले की, समाजातील सर्व शिक्षितांनी ग्रंथांशी मैत्री करावी. ग्रंथ आपल्याला ज्ञान, कौशल्य व सन्मान प्राप्त करून देतात. तसेच ग्रंथ आपल्यावर संस्कार करतात. त्यांनी ‘संस्कृती’ या शब्दाचा अर्थ विशद करत “संस्कार युक्त कृती म्हणजे संस्कृती” अशी व्याख्या केली व ग्रंथ आपल्यावर संस्कार करत कृतिशील बनवतात असे मत व्यक्त केले .तसेच डॉ. गोरे यांनी ‘वच ‘या संस्कृत धातू शब्दाचा अर्थ विशद केला व ‘वाचता वाचता वाचे’ या शिर्षकाचे महत्व विशद केले.
वाचनालयाच्या उत्कृष्ट वाचकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन पुरस्कृत करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री शिवाजी बिरादार यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. संतोष पोतरे यांनी सादर केले. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. अजित रंगदळ,उपसरपंच औदुंबर पांचाळ, माजी सरपंच श्री गोविंदराव गुणवंत बिरादार ,माजी सरपंच श्री बालाजी बिरादार,शिक्षक श्री बालाजी बिरादार, प्रा.डा.संतोष अनकल्ले,प्रा.संतोष पोतरे, शिबिरार्थी ,गावातील प्रतिष्ठित नागरिक व वाचक उपस्थित होते.
