मौजे बामणी गावात रासेयो विभागाचे आरोग्य शिबीर संपन्न
मौजे बामणी गावात रासेयो विभागाचे आरोग्य शिबीर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबीर मोजे बामणी या दत्तक गावी सुरु आहे. या शिबिराच्या विविध उपक्रमापैकी एक उपक्रम म्हणून रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रासेयो विभागाचे मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ.सुरेश शिंदे होते. यावेळी विचार मंचावर पोट विकारतज्ज्ञ डॉ.महेश धुमाळे,डॉ.अजित पाटील, सौदागर एम.एच.,सुशील साबणे, कार्यक्रमाधिकारी डॉ.ए. सी. आकडे होते. हा कार्यक्रम संयुक्तरित्या घेण्यात आला.यामध्ये रक्तदान व आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.महेश धुमाळे यांनी पोट विकाराच्या प्रश्नांवर भाष्य केले. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य या गोष्टींचे रुग्णाने पालन करावे, तसेच योग्य अन्न सेवन, जागरण न करणे, सकारात्मक विचार करणे यामुळे तुमची जीवनशैली बदलते. आहाराबरोबर व्यायामाचे महत्वही यांनी विशद केले. रुग्णांची तपासणी करून आरोग्य विषयक माहिती दिली. तसेच सौदागर एम. एच.यांनीही रक्तदान करताना स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तींनी वर्षातून किमान तीन ते चार वेळा रक्तदान केले पाहिजे. असे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सुरेश शिंदे म्हणाले की, मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठी संपत्ती आरोग्य आहे. आरोग्याचे जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजग व सतर्क राहिले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.एस. डी. निटुरे यांनी मानले. या कार्यक्रमाला सुशील साबणे, लक्ष्मी सूर्यवंशी, निकिता एकलिंगे, रुपावती कांबळे, पल्लवी कांबळे, पोट विकार तज्ज्ञ डॉ.अजित पाटील आयुष्यमान आरोग्य मंदिर बामणी,तुकाराम चौधरी,दिलिप बिरादार, ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
