शिवजयंती व रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
शिवजयंती व रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वर्ष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय, आंतर विद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून, या परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी खास चीन हून बीज भाषक म्हणून ग्वांग डांग विद्यापीठाचे परकीय भाषा विभाग प्रमुख डॉ. विवेक मणी त्रिपाठी हे उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या समारोपप्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य ज्ञानदेव झोडगे गुरुजी हे अध्यक्षस्थान भूषविणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील, कार्यकारणी सदस्य काकासाहेब गोविंदराव पाटील, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिवसभर चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेला देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी शोधनिबंध सादर करणार असून, या परिषदेत शोध निबंध संग्रहांचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. या परिषदेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे समन्वयक डॉ. प्रकाश चौकटे, सह समन्वयक डॉ. मारोती कसाब यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले आहे.
