उदगीर येथे विश्व मराठी साहित्य संमेलन घेणार : माजी मंत्री आ. संजय बनसोडे

0
उदगीर येथे विश्व मराठी साहित्य संमेलन घेणार : माजी मंत्री आ. संजय बनसोडे

उदगीर येथे विश्व मराठी साहित्य संमेलन घेणार : माजी मंत्री आ. संजय बनसोडे

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीरची शिक्षणाबरोबरच आता साहित्य व सांस्कृतिक नगरी म्हणुन महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. गेल्या ५ वर्षात विविध साहित्य संमेलने ही उदगीरला झाली. या नगरीमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. भविष्यामध्ये उदगीर येथे विश्व मराठी साहित्य संमेलन घेणार असल्याची घोषणा माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालयात आयोजित तिसरे लोकसंस्कृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

प्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव अध्यक्षस्थानी होते.यावेळी सिने अभिनेत्री अदिती सारंगधर, उर्मिला डांगे, अभिनेते चंद्रशेखर सांडवे, स्वागताध्यक्ष बस्वराज पाटील, कार्यवाह रामचंद्र तिरुके, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य मार्तंड कुलकर्णी, भारत सातपुते, विलास सिंदगीकर, सतीश उस्तुरे, प्राचार्य रामकिशन मांजरे, रमेश अंबरखाने, अनिल मुदाळे, अॅड वर्षा कांबळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

वृंदावनातील तुलसीला जल अर्पण करून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या साहित्य संमेलनासाठी सकाळी आठ वाजता अण्णाभाऊ साठे चौकातून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली त्यानंतर भव्य चित्र प्रदर्शन, पुस्तक विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन,फँशन डिझाईन कलाकृतीच्या स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आ. संजय बनसोडे म्हणाले, या परिसराचा भौतिक विकास मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. शैक्षणिक विकासासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत या भागातले साहित्यिक समृद्ध करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून या भागातल्या लोकांची विद्वत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय उदगीरची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी वर्षभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोककलेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यावेळी साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव म्हणाले, लोक संस्कृती व साहित्य यांचा जवळचा संबंध आहे. प्रकृती, संस्कृती व विकृती याचा माणसांवर परिणाम होत असतो. लोकसंस्कृती ही सर्व क्षेत्राला प्राण पुरवत असते कथा, कविता, कादंबऱ्या व चित्रपटातील गाणी ही अनेक वर्ष ऐकल्यानंतर किळसवाणे होतात, त्यातील जिवंतपणा संपतो. तेव्हा लोक संस्कृती म्हणजे सामान्य लोकांची संस्कृती ही त्यास पुनर्जीवित करण्यासाठी प्राण पुरवत असते. म्हणून लोकसंस्कृती ही साहित्य, संगीताची जननी म्हणून ओळखली जाते. जे साहित्यिक व चित्रपट कलावंत साहित्याशी नाळ जोडुन असतात, साहित्याचे वाचन करत असतात, तेच त्या क्षेत्रामध्ये चिरकाल टिकत असतात. ज्यांनी साहित्याला सोडले ते चित्रपट व साहित्यिक क्षेत्रातुन कालांतराने बाहेर फेकले जातात असे सांगितले.

या संमेलनाच्या यशस्वितेसाठी रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, सचिव प्रा.ज्योती मद्देवाड, उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी, रामदास केदार, रसुल पठाण, लक्ष्मण बेंबडे, महादेव खळुरे, मारोती भोसले, बाबासाहेब मादळे, सचिन शिवशेट्टे, संदीप निडवदे, नागनाथ गुट्टे, हणमंत केंद्रे, आकाश कवडेकर, ज्ञानेश्वर बडगे, चंद्रदीप नादरगे, जहाँगीर पटेल, ॲड.महेश मळगे, निवृत्ती जवळे, प्रल्हाद येवरीकर, अंजली स्वामी, निता मोरे, विवेक होळसंबरे, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी चित्रप्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, ग्रंथाचे विविध स्टाॅल उभारण्यात आले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!