पालकांनी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्यावे – पो. नि. संतोष पाटील
पालकांनी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्यावे - पो. नि. संतोष पाटील
लातूर (प्रतिनिधी) : सध्याच्या युगात पालकांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुलांचा कल मोबाईलकडे वाढत चालला आहे. आपली मुले मोबाईलमध्ये गुरफटून जात आहेत. आपल्या मुला -मुलीं मधील आवड निवड याकडे लक्ष देवून त्यांच्या अंगी असणारी कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या वैयक्तिक विकासा बाबत अधिक सजग रहावे, असे आवाहन लातूर येथील विवेकानंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले आहे.
ते लातूर पुर्व भागातील जयनगर येथील आझाद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुजाहेद शेख हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे माजी नगरसेवक इम्रान सय्यद, लातूर पंचायत समिती शालेय पोषण आहार वर्ग दोन अधिक्षक दिनकरराजे होळकर, औशाचे माजी नगरसेवक विवेक मिश्रा, नोडल प्रमुख वनिता अकनगिरे, यशवंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मिना थोरात, गुड न्यूज चर्चचे बेंजामीन दुप्ते, हनुमान विद्यालय घारगावचे मुख्याध्यापक अरुण जाधवर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भागवत ससाने हे उपस्थित होते.
या पालक मेळाव्यास दिनकरराजे होळकर, इम्रान सय्यद, विवेक मिश्रा यांनी संबोधित केले.
अध्यक्षीय समारोपात बोलताना मुजाहेद शेख यांनी पालकांनी मुले मोबाईल पाहत असताना लक्ष द्यावे, व मुलांना अभ्यासासोबत खेळाकडे वळवावे, असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक मतीन पटेल यांनी प्रास्ताविकात शालेय प्रगतीची माहिती दिली .शाळेची माजी विद्यार्थीनी अभियंता गिता शिखरे हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुलेखा कांबळे यांनी केल. उपस्थितांचे आभार संजय सगरे यांनी व्यक्त केले.
