लातूरच्या संशोधक विद्यार्थ्यांच्यावतीने औसा भुईकोट किल्यावर स्वच्छता मोहीम
लातूरच्या संशोधक विद्यार्थ्यांच्यावतीने औसा भुईकोट किल्यावर स्वच्छता मोहीम
आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीच्यापार्श्वभूमीवर राबविले अभियान
औसा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहाने जगभरात साजरी करण्यात आली . याच पार्श्वभूमीवर लातूरच्या संशोधक विद्यार्थ्यांनी औसा भुईकोट किल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती दयानंद कला महाविद्यालय, लातूर चे संशोधक विद्यार्थी सागर यादव यांनी दिली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे व श्रीकांत देशमुख यांनी पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना झूम मीटिंगद्वारे शिवरायांचे गड किल्ले संवर्धन करून स्वच्छता अभियान राबविण्याचा सल्ला दिला होता . याच अनुषंगाने सारथी विभागीय कार्यालय, लातूर चे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. राहुल जाधव , प्रकल्प अधिकारी असलम शेख व ज्योती ढगे यांनी गड किल्ले संवर्धन, ऐतिहासिक वारसाचे जतन, प्रेरणादायी इतिहासाची नवीन पिढीला माहिती, त्याचबरोबर व्यक्तीचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वेळोवेळी गड किल्ले संवर्धन करून व स्वच्छता अभियान राबवून शिवरायांचा इतिहास जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले . लातूरच्या जवळ असलेला औसा येथील भुईकोट किल्ल्यावर लातूरच्या वेगवेगळ्या महाविद्यालयात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यानी औसा येथील भुईकोट किल्ल्यावरील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला आहे.
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या अभियानाला सुरुवात केली होती. अवघ्या काही तासात येथील कचरा जमा करून नगरपरिषदेच्या साह्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित लातूर मधील दयानंद कला महाविद्यालय , दयानंद विज्ञान महाविद्यालय , शाहू महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय येथील वेगवेगळ्या विषयात पी.एच.डी चे संशोधन करणारे विद्यार्थी सागर गणपत यादव , महेशकुमार जाधव, पवन भोसले, जगन्नाथ कदम, प्रमोद बचिफले, नरसिंग शिंदे, यांच्यासह शेकडो संशोधक विद्याथ्यांची उपस्थिती होती.
यापूर्वी दिनांक 13 जानेवारी रोजी लातूरच्या संशोधक विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ राजे जाधव यांचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२७ व्या जयंती निमित्त जिजाऊसृष्ठी येथे स्वच्छ्ता अभियान राबवून सिंदखेडराजा येथील मातृतीर्थावरील कचरा अवघ्या दोन तासात उचलून परिसर स्वच्छ केला होता.
