धर्मनिरपेक्ष भारताचा पाया छत्रपती शिवरायांनी रचला – शिवश्री प्रदीप ढगे
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकामध्ये अठरापगड जाती व विविध धर्मातील लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. स्वराज्यावर प्रेम असणारा प्रत्येक मावळा हा मराठा होता. जाती-धर्मा पेक्षा छत्रपती शिवरायांनी गुणवत्तेला अधिक प्राधान्य दिले होते. त्यामुळेच केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिमांनी देखील हिंदवी स्वराज्याच्या निर्मिती मध्ये आपले योगदान दिल्याचे दिसून येते. विसाव्या शतकामध्ये ब्रिटिशां पासून स्वतंत्र झालेल्या भारताने अंगीकृत केलेल्या धर्मनिरपेक्ष भारताचा पाया छत्रपती शिवरायांनी रचला होता, असे मत शिवश्री प्रदीप ढगे यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहि:शाल व्याख्यान मालेतील डोंगरशेळकी येथे दुसरे पुष्प गुंफतांना ‘धर्मनिरपेक्ष राजा : छत्रपती शिवराय’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर भानुदास मुंढे, सुरेश मुंढे, गंगाधर सूर्यवंशी, नरसिंग मुंढे, प्रा. संजय बिबीनवरे, प्रा. सतीश मुंढे यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिवश्री प्रदीप ढगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंदनीय आहेत. त्यामुळे आपल्या देशातील अनेक समाज सुधारक व महापुरुषांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सामाजिक क्रांती घडवून आणली, तसेच जगातील विविध राष्ट्र प्रमुखांनी छत्रपती शिवरायांच्या शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या मार्गाचा अवलंब करून, आपले अस्तित्व टिकवून ठेवले. सामान्य माणसांकडून असामान्य कार्यकर्तृत्व करून घेण्याची क्षमता छत्रपती शिवरायांमध्ये होती. तोच शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणाईने वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, सर्वसामान्य मावळ्यांना सोबत घेऊन ही नवीन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय हे चिरंजीवी आहेत. ते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. छत्रपती शिवरायांचे मावळ्याच्या जातीकडे नव्हे तर सळसळत्या रक्ताकडे लक्ष होते. त्यामुळे महापुरुषांना एका जातीमध्ये बंदिस्त करू नये, असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय बहि:शाल केंद्राचे समन्वयक डॉ. गौरव जेवळीकर यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहुरे यांनी तर बाबुराव मुंढे यांनी आभार मानले. यावेळी डोंगरशेळकी गावातील नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
