फायदेशीर पशुपालन व्यवसायाकरिता शाश्वत जंतनियंत्रण आवश्यक- कुलगुरू डॉ. नितीन पाटील
फायदेशीर पशुपालन व्यवसायाकरिता शाश्वत जंतनियंत्रण आवश्यक- कुलगुरू डॉ. नितीन पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) : पशुपालन व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर करावयाचा असेल तर शाश्वत जंतनियंत्रण आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्त केले. ते पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवाद कार्यकामाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भारतीय पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र संघटनेच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त माफसू नागपूर आणि भारतीय पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
परिसंवादाचे उद्घाटक म्हणून पुढे बोलताना डाॅ. नितीन पाटील यांनी या परिसंवादातून जंतनिर्मूलनासाठी काहीतरी ठोस उपाय योजना समोर यावी, अशी आशा व्यक्त केली.
सदरील राष्ट्रीय परिसंवाद डाॅ. नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रा. डॉ राजेश कटोच, अधिष्ठाता, जम्मू हे या राष्ट्रीय परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पशुतील जंतप्रादुर्भावामुळे होणारे आजार आणि आर्थिक नुकसान यावर प्रकाश टाकला. तसेच संतुलित पशुआहार, उत्तम व्यवस्थापन आणि स्वच्छता यातून मोठ्याप्रमाणात जंतप्रादुर्भावावर नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळू शकतो. त्याबरोबराच जंत प्रादुर्भावच्या आधुनिक संशोधनाबद्दल देखील उपस्थिताना मार्गदर्शन केले. या ऑनलाईन परिसंवादास देशभरातून सुमारे 150 हुन अधिक शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या परिसंवादाचे उद्घाटक म्हणून डाॅ. नितीन पाटील, कुलगुरू, माफसू, नागपूर हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच या परिसंवादासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. ए. संगरन, अध्यक्ष, भारतीय पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र संघटना, चेन्नई, सचिव डाॅ. अनिश यादव, जम्मू हे उपस्थित होते. तर परिसंवादाचे अध्यक्षपद सहयोगी अधिष्ठाता डाॅ. नंदकुमार गायकवाड यांनी भूषविले.परिसंवादाचे आयोजक सचिव प्रा डाॅ. गोपाळ भारकड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
डाॅ. नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात यशस्वी व किफायतशीर पशुपालन व्यवसायात जंतनिर्मूलनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. मत्स्यगंधा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. अशोक भोसले यांनी केले. या परिसंवादाच्या यशस्वी आयोजना साठी डाॅ. गोपाळ भारकड, डाॅ. अशोक भोसले, डाॅ. अनिल पाटील, डाॅ. मत्स्यगंधा पाटील, डाॅ. संजय धावारे, डाॅ. प्रफुल्लकुमार पाटील, डाॅ. महेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. परिसंवादासाठी प्राध्यापक डाॅ. अशोक देवांगरे यांच्यासह इतर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
