काळानुरूप महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या परिघाचा विस्तार करावा – प्राचार्य डॉ वसंत बिरादार
काळानुरूप महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या परिघाचा विस्तार करावा - प्राचार्य डॉ वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला फार मोठे स्थान आहे, सुरुवातीपासूनच स्त्रियांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचा इतिहास आहे. काळानुरूप महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या परिघाचा विस्तार करावा तसेच विविध क्षेत्रात प्रगल्भ अस्तित्वाचा अवीट ठसा उमटवावा, असे प्रतिपादन ललित लेखक, समीक्षक साहित्याचे अभ्यासक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. विभागांतर्गत युवती कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर प्रा. सौ. डॉ. सीमा उप्परवाड, प्रा. कल्पना कदम व प्रा. सौ प्रतिक्षा मंडोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, साहित्य, कला, संस्कृती , विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. भारतीय संस्कृतीचे जतन करत त्या कौंटूबिक, शैक्षणिक, राजकिय, सामाजिक, आर्थिक तसेच सार्वजनिक जीवनामध्ये ही तेवढ्याच विश्वासाने जबाबदारी पार पाडीत आहेत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य व आयक्युएसीचे डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर आभार नॅक कर्डिनेटर डॉ. प्रशांत बिरादार यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
