महात्मा बसवेश्वरांनी जगाला राजेशाहीतून लोकशाही दिली – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
महात्मा बसवेश्वरांनी जगाला राजेशाहीतून लोकशाही दिली - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : समता, ज्ञान, बंधुता या त्रिसूत्राचे प्रणेते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी राजेशाहीतून जगाला लोकशाहीची शिकवण देण्याचे कार्य केले, असे स्पष्ट प्रतिपादन मराठी साहित्याचे ज्येष्ठ लेखक व समीक्षक तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकामध्ये अनुभव मंटपच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता त्याचबरोबर सर्वांना समान न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. याबरोबरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकास व मानवता धर्म याची शिकवण जगाला दिली, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर व सूत्रसंचालन डॉ. सतीश ससाणे यांनी तसेच आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सचिन गर्जे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
