युवा नेते गजानन भोपणीकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्ष बांधणीला गती – मनोज कनाडे

उदगीर (एल पी उगिले): उदगीर, देवणी आणि जळकोट या तिन्ही तालुक्यात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवलेल्या गोविंदराव भोपणीकर यांचा आदर्श जपत, त्यांचे चिरंजीव उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेस अंतर्गत गतिमान काम करत होते. नेतृत्व करत असताना कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची त्यांची कला, संघटन कुशलता यामुळे त्यांची लोकप्रियता संपूर्ण मतदारसंघात तरुणांमध्ये पसरली आहे. तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेल्या गजानन भोपणीकर यांनी नुकताच उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. युवा नेते गजानन भोपणीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज कन्नाडे व मित्र परिवाराच्या वतीने उत्कर्ष हॉलिडेज उदगीर या ठिकाणी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गजानन भोपणीकर यांच्या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज कन्नाडे यांनी व्यक्त केला. यावेळी ब्रह्मानंद स्वामी, शिवाभाऊ रेड्डी, शिवाजी बिरादार ,नामदेव सूर्यवंशी,प्रमोद जीवणे, आशिष जाधव,सतिश गायकवाड,रवी बिराजदार,राहुल शिंदे,चनबस झुंगा आदी प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते.याप्रसंगी झालेल्या सत्काराला उत्तर देताना गजानन भोपणीकर यांनी स्पष्ट केले की, सध्या आपल्या परिसराच्या विकासासाठी महायुती शिवाय पर्याय नाही. महाविकास आघाडीला आपापसातील मतभेद आणि एक दुसऱ्याचे उणेदुणे काढून कार्यकर्त्यांचे पाय खेचण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये अजित दादा पवार यांच्यासारखे कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वाची खरी गरज आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भविष्यकाळात लातूर जिल्ह्यात सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक राजकारण करून जनतेची सेवा करण्याच्या सेवाभावी वृत्तीतून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार आणि शिक्षण खात्यामध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे त्यांच्या पक्षप्रवेशाने महायुतीला फायदाच होईल असे विचार अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. संयोजन समितीच्या वतीने प्रा. मनोज कनाडे यांनी आभार व्यक्त केले.