उदगीरचा वळण रस्ता केला खड्ड्यात, अवजड वाहने बिनधास्त गल्लीबोळात !!

उदगीर (एल.पी.उगीले) : मागील काळात उदगीरच्या विकासाच्या नावाने कोट्यावधीचा निधी आला. विकास कामेही झालेही, मात्र कित्येक कामे अत्यंत दर्जाहीन आणि निकृष्ट झाल्यामुळे काम होऊन काही महिने झाले न झाले तोच, “येरे माझ्या मागल्या कालच्याच ताक कन्ह्या चांगल्या….”अशी स्थिती होऊन बसू लागली आहे. तसाच काहीसा प्रकार उदगीरच्या वळण रस्त्याचाही झाला आहे. अवजड वाहनांना शहरात प्रवेश देण्याऐवजी ती वाहने परस्पर वळण रस्त्यांनी निघून जावीत आणि रहदारीला कोणतीही अडचण होऊ नये. या उद्देशाने वळण रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्राधान्याने लातूर कडे जाणाऱ्या नळेगाव मार्गे वाहनांना जर बिदर कडे जायचे असेल तर शहरातून जाण्याऐवजी त्यांनी सरळ शासकीय विश्राम गृहपासून वळण मार्गाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे चौकातून सरळ बिदर कडे जाता येऊ शकेल. या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्च करून हा रस्ता बनवला खरा, मात्र या रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कित्येक वाहन चालक वळण रस्ता गेला खड्ड्यात असेच बोलत आहेत. आणि इतके खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे म्हणजे लगेच वाहनाचे दुकान लावणे होय, असे वाटू लागल्याने वाहन चालकांनी शहरातून अवजड वाहने घेऊन जाणे पसंत केले आहे. वळण रस्त्याने जायचे म्हणजे अंगाची हाडे खिळखिळी करणे आणि अवजड वाहनांचेही नुकसान करून घेणे, असे असल्याचे बोलले जात आहे. शिवाय या खड्डेमय रस्त्यातून जायचे म्हणजे तारेवरचे कसरत करत जावे लागत आहे. अशी परिस्थिती आहे. चाळण झालेल्या या रस्त्यावरून जायचे झाल्यास छोट्या मोठ्या अपघाताची मानसिक तयारी ठेवावी लागते.

लातूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पाठोपाठ उदगीर शहराचा विकास प्रचंड गतीने होऊ लागला आहे. उदगीरच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात इतर राज्यातूनही माल येतो आहे, त्या मालासाठी अवजड वाहनेच वापरावी लागतात. उदगीर शहर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा आणि तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे या वळण रस्त्यावरून पूर्वी मोठी वाहतूक होत होती. मात्र सध्या खड्डेमय रस्ता झाल्यामुळे बिनधास्तपणे गाड्या शहरातून ये जा करत आहेत. शहरात नव्याने सिग्नल व्यवस्थेला पुनर्जीवित करण्यात आले आहे, आणि अवजड वाहने शहरात आल्यास चौका चौकात सिग्नलच्या ठिकाणी ही वाहने लवकर निघू शकत नसल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. चौका चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्यासाठी ही अवजड वाहने कारणीभूत ठरू लागले आहेत. गंमत म्हणजे पोलीस प्रशासनाला देखील याचे काही देणे घेणे नाही, हेतूपूर्वक या वाहतुकीच्या कोंडीकडे आणि अवजड वाहनाच्या शहरातील प्रवेशाकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नाही, असे चित्र आहे. मागील काळामध्ये अनेक वेळा या वळण रस्त्याच्या दुरुस्तीची कामे झाली आहेत. मात्र ती कामे इतकी निकृष्ट झाली आहेत की, आता संबंधित खात्याला देखील या रस्त्याच्या कामासाठी निधी कसा मागावा? हा नैतिक प्रश्न पडलेला असू शकतो. त्यामुळेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असावे, अशीही चर्चा असून नाईलाज म्हणून वाहनधारकांना त्रास सहन करत या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून शहरातील रस्त्याचा वापर करावा लागतो आहे. त्याचा त्रास इतरांना झाला तर झाला, आपल्याला त्याचे काय? अशी असंवेदनशीलता या वाहन चालकांमध्ये दिसून येत आहे.