बोगस बियाणे विक्री, खतांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईकेली जाईल – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर (एल पी उगिले) : संपूर्ण जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसवणे किंवा खताची लिंकिंग करून शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीदरम्यान दिला आहे. यापूर्वी लातूर येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची त्यांनी यावेळी माहिती घेतली.जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत असला तरी शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात 80 ते 100 मि.मी. पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. सोयाबीन पेरणीसाठी घरचे सुस्थितीतील, पावसात न भिजलेले बियाणे वापरावे, आणि त्याची उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. भोसले यांनी दिल्या. तसेच रुंद सरी व वरंबा (बीबीएफ) किंवा टोकण पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात 20 टक्क्यांपर्यंत वाढ शक्य असल्याने याविषयी जनजागृतीवर भर द्यावा, असे पालकमंत्री म्हणाले.शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावीत, आणि पक्की पावती जपून ठेवावी. बोगस बियाणे, खते विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात ११ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कृषी निविष्ठांबाबत तक्रारी असल्यास तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा टोल-फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. बोगस बियाणे विक्री, खतांचा काळाबाजार किंवा लिंकिंग करणाऱ्या कंपन्या आणि कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.