27 वर्षानंतर वर्ग मित्रांची एकत्रित भेट
उदगीर (एल.पी. उगीले) : तालुक्यातील मोजे तोंडार येथील नेहरू मेमोरियल हायस्कूल विद्यालयातील 1998 साली दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या चाळीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तब्बल 27 वर्षानंतर एकत्र येत, दिवसभर एक दुसऱ्याच्या आठवणी आणि सुखदुःखाची देवाण-घेवाण केली. या गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक एम बी पटवारी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव आदर्श शिक्षक मल्लिकार्जुन बिरादार, मंत्रालयातील अधिकारी पदावर कार्यरत असलेले माधवराव पटवारी, माजी शिक्षक मारुतीराव बिरादार, रामराव बिरादार, मुख्याध्यापक पी. के. शेटकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सकाळी सरस्वती पूजनानंतर स्वागत, सत्कार व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. शाळा, शिक्षक, शालेय परिसर या संदर्भात मनसोक्त चर्चा केली. अनुभव कथनामध्ये आपल्याला शिकवलेल्या आदर्श शिक्षकाबद्दलची माहिती ही तत्कालीन विद्यार्थ्यांनी दिली. प्रत्येकाने आपल्या जीवनातील घडामोडींच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली, सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण आपापल्या सुखदुःखात रममान आहे, छोट्या छोट्या ताण तणावामुळे धावपळ करतो आहे. समाजातील इतर घटकांच्या संदर्भातही विचार केला पाहिजे, आपल्या सोबत राहिलेल्या सहकाऱ्यांच्याही सुखदुःखाचा विचार केला पाहिजे, या भावनेतून अशा पद्धतीच्या गेट-टुगेदर ची खूप आवश्यकता आहे. अशा पद्धतीचे विचार अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या उत्कृष्ट कार्यक्रमाचे संचलन आदर्श शिक्षक दिगंबर बिरादार यांनी केले. तर संयोजन सुनील पाटील, माधव पांडे, राजकुमार बिरादार, गोविंद पांडे यांच्यासह विद्यार्थिनींचाही मोठा सहभाग होता. आभार प्रदर्शन माधवराव पांडे यांनी केले.चौकट……..गेट-टुगेदर कार्यक्रमातून सामाजिक जाणीवांची पेरणी होते…बाल वयात एकत्र राहिलेले, एक दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारे वर्गमित्र जेव्हा 25 – 30 वर्षानंतर भेटतात. एक दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करतात. सामाजिक जाणीवातून एक दुसऱ्याला मदतीची भावना व्यक्त करतात, तेव्हा निश्चितच त्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीवांची पेरणी होते. ज्या समाजातून आपण वाढलो, मोठे झालो. त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. ही जाणीव निर्माण होते. हेच गेट-टुगेदर सारख्या कार्यक्रमाचे यश आहे. असे विचार अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.चौकट……अनेक जण सेवानिवृत्त झालेले विद्यार्थी….सन 1998 मध्ये दहावी पास आऊट झालेले, अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झाले होते. शासकीय आणि निमशासकीय सेवेतूनही काहीजण सेवानिवृत्त झालेले मित्र या गेट-टुगेदर कार्यक्रमात सहभागी झाल्याने एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. आपण कशा पद्धतीने कार्य केले याचाही आढावा अनेकांनी सांगितला. पारिवारिक स्थितीची ही माहिती एक दुसऱ्याला दिली. तब्बल 27 वर्षानंतर एक दुसऱ्याच्या सुखदुःखात हे मित्र सहभागी झाले.
