नांदगाव ते बसवंतपुर रस्त्याची दुर्दशा; दुचाकी स्वारांसह प्रवाशांची गैरसोय
नांदगाव ते बसवंतपुर रस्त्याची दुर्दशा; दुचाकी स्वारांसह प्रवाशांची गैरसोय
लातूर (प्रतिनिधी) : वाहनांची वर्दळ असलेल्या नांदगाव बसवंतपूर या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. जागोजागी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झालेत रस्त्यांवर सतत अपघात होत आहेत. वाहनधारकांना उन्हाळ्यात धुळीचा अन् पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे.
नांदगाव, साई, रायवाडी,आरजखेडा या गावचे बहुसंख्य वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. शिवाय एमआयडीसी गाठण्यासाठी हाच जवळचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा नागरिकांना त्रस्त करणारा प्रश्न आहे. खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारक नागरिकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याकडे संबंधित प्रशासनातील विभागाचे दुर्लक्ष आहे. उन्हाळ्यात धुळीचे लोट पसरत आहेत पादचारी दुचाकी स्वरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या धुळीमुळे अपघातासोबतच आरोग्य ही धोक्यात येत आहे. रस्त्यावर मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे एखादे मोठे वाहन रस्त्यावरून गेल्यानंतर धुळीचे लोट पसरत आहेत. याचा त्रास पाठीमागून चालणार्या दुचाकी पादाचारी व रस्ते शेजारी शेतात काम करत असलेल्या शेतकर्यांना होत आहे. धुळीचे लूट अंगावर घेत दुचाकी स्वरांना मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक वेळेस धुळीचे लोट फुटल्यानंतर समोरचा रस्ता दिसत नाही त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत.
वाहनधारकांना लातूरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून नांदगाव बसवंतपुर मार्गे लातूर हा मार्ग आहे. मात्र या रस्त्याची दुरावस्था असल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. नांदगाव ते एमआयडीसी दहा मिनिटांचा प्रवास असताना वाहन धारकांना खड्ड्यांमुळे एक तास प्रवास करून लातूरला पोहोचावे लागत आहे. रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्याचे दगड सर्वत्र पसरले आहेत.
