अहमदपूरात आगळावेगळा शिवविवाह; ना विधी, ना भटजी, ना अक्षता, ना सत्कार सोहळा

अहमदपूरात आगळावेगळा शिवविवाह; ना विधी, ना भटजी, ना अक्षता, ना सत्कार सोहळा
अहमदपूर (गोविंद काळे) : लग्न म्हंटल की, सनई चौघडे आले, लम्नविधी लावणारे आले, विधी, शुभमुहूर्त आले आणि डीजे बँड बाजाचा धुमधडाका आला. हिंदू धर्मात अशाच पद्धतीने लग्न केले जाते. मात्र मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके यांनी त्यांच्या पुतण्याचा विवाह हा पारंपरिक पद्धती तसेच मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरा व वैदिक पद्धतीला पूर्णपणे छेद देत वर्षा गार्डन, अहमदपूर येथे दि. १७ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवविवाह पार पाडला.
वर्षा गार्डन, माळेगाव रोड येथे पार पडलेला शिवविवाहातील चि. प्रतिक गोपाळ शेळके ( माळेगाव खु. ) व ऐश्वर्या सोपान जगताप ( बावळगाव ता.चाकुर )या उच्च शिक्षित वर वधूचे नाव आहे. या शिवविवाहात ना ब्राह्मण होते, ना त्यांनी काढलेला मुहूर्तः ना अक्षता, ना फटाक्याची आतीषबाजी , ना बाजा होता राजमाता जिजाऊ, आध्यगुरू तुकोबाराय व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून हा शिवविवाह सोहळा पार पडला. त्यामुळे या अनोख्या लग्नाची चर्चा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रा. शेळके यांनी शिवविवाहाची पत्रिका काळ्या रंगाची छापून समाजात साधक बाधक चर्चेला सुरुवात झाली .त्यासोबत त्यांनी सामाजिक प्रबोधनात्मक ४- ५ पुस्तके अनेकांना लग्नाचा आहेर म्हणून भेट स्वरूपात दिला होता.
सुरुवातीस मंचावर वर- वधू व त्यांचे माता-पिता हे विराजमान होते.यानंतर वधू-वराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यानंतर सरोजा भोसले यांनी जिजाऊ वंदना सादर केली. तद्नंतर शिव व्याख्याते शिवशंकर लांडगे यांनी शिवपंचके सादर केली.
त्यानंतर वर व वधूने शपथ घेतली. एकमेकांना हार घातला आणि सर्व नातेवाइकांना दंडवत घालून शुभाशीर्वाद घेऊन हा शिवविवाह सोहळा पार पडला.
या शिवविवाह सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर प्रतिष्ठीत नेतेमंडळी, जेष्ठ वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, संपादक, पत्रकार मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, विविध विभागामधील अधिकारी या सर्वांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे कोणाचाही हार तुरे देऊन स्वागत करण्यात आले नाही.
आपल्या प्रस्ताविकात प्रा.शेळके यांनी नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या उजव्या बाजूला बसवली होती कारण सिंधू संस्कृतीत स्त्रियांना कनिष्ठ दर्जा नव्हता. तसेच या ठिकाणी अक्षता ऐवजी टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. अक्षताच्या माध्यमातून अन्नाची नासाडी होते आणि अन्न नासवणे म्हणजे आपल्या शेतकरी बापाचा अपमान आहे. एकीकडे आदिवासी भागांमध्ये अन्न अन्न करून लोक मरत असताना केवळ परंपरेच्या नावाखाली अक्षता म्हणून अन्नाची नासाडी करणे हे आपल्या देशाला परवडणार नाही.म्हणून त्यांनी अक्षदा म्हणून धान्यऐवजी टाळ्या वाजवून धान्याची नासाडी करण्याची कूप्रथा थांबवण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे हुंडा पद्धतीचा विरोध करीत एकही रुपया हुंडा न घेता हा शिवविवाह संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यात कोणतीच वस्तू भेट रूपाने वधू पक्षाकडून स्विकारण्यात आली नाही. अशा शिवविवाह सोहळ्यांची संख्या वाढत गेल्यास मुलीच्या वडिलांना तिच्या लग्नाची चिंता वाटणार नाही. असेही परिसरात बोलले जाते.
दानपेटीत २८,४०२ रुपये….
प्रा.गोविंदराव शेळके, यांचा मागील अनेक वर्षापासून परिवर्तनवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या कृती मधून दिसून आला. या शिवविवाहची निमंत्रण पत्रिकाच काळया रंगाची होती जी की शुभ कार्यात अशुभ समजली जाते. या पत्रिकेत लिहिलेला मजकूर आहेर करण्याची कोणाची इच्छा असेल तर वस्तू स्वरूपातील आहेर आणू नये, इत: पर कुणाची भावना झाल्यास आपापल्या इच्छेनुसार बंद लिफाफ्यात नगद भेट द्यावी व जमलेली रक्कम अहमदपूर येथे होऊ घातलेल्या मुलींच्या वस्तीगृहासाठी सुपूर्त करण्यात येईल. असे लिहीले होते. त्या दानपेटीतून आलेली आहेर स्वरूपातील नगद रोख 28 हजार 402 रुपये मीटिंग बोलावून सर्वांच्या समक्ष प्रा. शेळके यांनी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक चापटे यांच्याकडे सुपूर्दही केली.