चळवळीच्या दबावामुळे प्रश्न सुटू शकतात- रविकांत तुपकर

0
चळवळीच्या दबावामुळे प्रश्न सुटू शकतात- रविकांत तुपकर

चळवळीच्या दबावामुळे प्रश्न सुटू शकतात- रविकांत तुपकर

उदगीर (एल पी उगिले) : चळवळीच्या दबावामुळे शासनकर्त्यांवर अंकुश राहून अनेक लोकोपयोगी निर्णय होऊ शकतात, म्हणून शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा दिल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन होऊ शकते. असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.लाॅ.आशोकभाई महेता उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय सभागृहात मराठवाडा जनता विकास परिषद शाखा उदगीर च्या वतीने आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.रामप्रसाद लखोटिया होते. मंचावर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रामराव बिरादार, खरेदी-विक्री संघाचे संचालक व्यंकटराव पाटील अवलकोंडेकर, मराठवाडा विकास परिषदेचे उदगीर शाखा सचिव प्रा.एस.एस.पाटील यांची उपस्थिती होती.यावेळी परिसरातील उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरवपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, चळवळीच्या दृष्टीने हा संक्रमणाचा काळ आहे.चळवळीचा दबाव निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. 25 जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे काम आहे.सत्याग्रह, आंदोलने,साहित्य संमेलनाचे आयोजन संघटनेच्या वतीने केले जाते.चळवळ क्षीण झाल्यास सत्ताधाऱ्यांचा अन्याय वाढत असतो.चळवळ लढायला शिकवते. शेतकऱ्यांनी वेगळे प्रयोग करून आपली शेती सुधारावी. त्या बरोबरच हक्क मिळवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे.शेती माल सोडून सर्व वस्तूचे भाव वाढलेले आहेत. शेतकऱ्यांचा दबाव गट नसेल तर दुर्दशा होऊ शकते.धोरण बदलण्या साठी मजबूत दबाव गट निर्माण झाला पाहिजे.सर्व पिकांचे शेतकरी एका झेंड्याखाली आले पाहिजेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्या प्रसंगी ज्याप्रमाणे मदत केली, तशी मदत शेतकरी संकटात असताना सरकारने केली पाहिजे.पैसा,गॉड फादर शिवाय राजकारण करता येते, ही बाब आपण सातत्याने चळवळीच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन पूर्ण वेळ वीज,पाणी,साठवणुकीसाठी गोदाम, नवे तंत्रज्ञान,विक्रीची व्यवस्था या बाबी मिळाल्यास कोणत्याही कर्जमाफीची आवश्यकता नाही.सरकार उद्योजकाचे कर्ज माफ करते, तसे शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालीच पाहिजे.आपल्या क्षमता आणि प्रतिभेचा वापर समाजासाठी करावा. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी यशवंत कुमठे,श्यामभाऊ सोनटक्के यांनी सेंद्रिय शेती व इतर शेती विषयी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.प्रास्ताविकात प्रा.एस. एस.पाटील यांनी मार्गदर्शन शिबिर घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. पाहुण्यांचा परिचय मुरलीधर जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.प्रवीण जाहूरे व बाबुराव माशाळकर यांनी केले. आभार राम मोतीपवळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहकोशाध्यक्ष विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर,प्राचार्य डॉ. दत्ता पाटील,कोषाध्यक्ष प्रा.महादेव खताळ,सदस्य दीपक बल्सुरकर, गणेश मुंडे,प्रा.डॉ.दत्तहरी होनराव, प्रा.डॉ.बी.आर दहिफळे,प्रा.राम कांबळे, शरद गायकवाड, सुधाकर फड यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!