मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सामना प्रतिनिधी वसंत पवार यांचा सत्कार
अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लातुर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान रुक्मीणी मंगल कार्यालय खाडगांव येथे ‘दै. सामना’ वृत्तपत्राचे अहमदपूर तालुका प्रतिनिधी वसंत पवार यांचा विशेष सत्कार केला. हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांची व्यथा वृत्तपत्रातून मांडून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.
अधिवेशनामध्ये या बातमीची दखल घेण्यात आल्यामुळे सरकारला संबंधित शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल घेणे भाग पडले, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वसंत पवार यांच्या कामाचे कौतुक केले. तळागाळातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी पवार यांचे अभिनंदन केले.
या सत्कारामुळे वसंत पवार यांच्या पत्रकारितेचे आणि त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग कसा होऊ शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या घटनेमुळे स्थानिक पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी उपोषणकर्ते जयराम पवार , प्रविण मुळके,उपसरपंच माधव पवार, राम मुळके, सुनिल पवार आदींची उपस्थिती होती
