महाराष्ट्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी खंबीरपणे उभे: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
पोलीस फ्लॅश न्यूज पुणे ( गोविंद काळे ‘ वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (WISM) द्वारे आयोजित ‘साखर जैव-ऊर्जा उद्योगाच्या नवीन क्षितिजावरील तांत्रिक चर्चासत्रा’मध्ये बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी, महाराष्ट्र सरकार साखर उद्योगाला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा साखर उद्योग हा देशातील सर्वात मोठा उद्योग आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तो कणा आहे.
पाटील यांनी सांगितले की, 1998 नंतर साखर उद्योगाच्या नियंत्रणमुक्तीमुळे गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्रात खाजगी साखर कारखान्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. सध्या राज्यात सुमारे 133 खाजगी साखर कारखाने कार्यरत असून, ते एकूण साखर उत्पादनाच्या 50%, इथेनॉल उत्पादनाच्या 70% आणि कोजन पॉवरच्या 60% उत्पादनासाठी जबाबदार आहेत.
त्यांनी यावर जोर दिला की, हे खाजगी कारखाने देखील पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. प्रत्येक कारखान्यात हजारो ऊस उत्पादक शेतकरी सभासद असून, हे उद्योग शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व्यावसायिक शिस्तीने चालवले जातात. याचमुळे, गेल्या 25 वर्षांत खाजगी कारखान्यांची संख्या सहकारी कारखान्यांपेक्षा जास्त झाली आहे.
पाटील यांनी साखर उद्योगाच्या उज्ज्वल भविष्याची कल्पना मांडली. ते म्हणाले, हा उद्योग आता केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित नसून, तो नूतनीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) उद्योगात रूपांतरित होत आहे. ऊसाच्या भुश्यापासून वीज, मळीपासून इथेनॉल, आणि भविष्यात विमानाचे इंधन, तसेच कारखान्यातील सांडपाणी आणि प्रेसमडपासून बायोगॅस, बायो सीएनजी, आणि ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन शक्य आहे.
सहकार मंत्र्यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख केला. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही साखर उद्योगाच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर आहेत. नुकतेच, राज्य सरकारने धान्यापासून इथेनॉल बनवण्याचे धोरण लागू केले आहे.
याव्यतिरिक्त, राज्य सरकार लवकरच बायो सीएनजीचे धोरण जाहीर करणार आहे. याआधीच ग्रीन हायड्रोजनचे धोरण जाहीर करून भरीव अनुदान आणि प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पाटील यांनी आश्वासन दिले की, सरकारचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आणि ग्रामीण जनता असून, साखर उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाचे धोरण काटेकोरपणे राबवले जाईल.
या चर्चासत्राला अध्यक्ष बी.बी ठोंबरे, महासचिव डॉ. पांडुरंग राऊत, डीएसटीए अध्यक्ष शहाजीराव भड, साखर आयुक्त सालीमठ, यशदा पुणे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जगदगनी, जैव ऊर्जा तज्ञ डॉ. संजय पाटील, तसेच खाजगी आणि सहकारी कारखान्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
