लातूर शहराच्या चौफेर विकासासाठी भाजपा व मित्रपक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम करावे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर शहराच्या चौफेर विकासासाठी भाजपा व मित्रपक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम करावे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते, पाणी व नाल्यांची सुविधा करून नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम झालेले आहे. निराधारांच्या पगारी, लाडक्या बहिणीच्या खात्यावर दीड हजाराची मदत अशा सुविधा देऊन महिलांना आधार देण्याचे कार्य महायुती सरकारने केलेले आहे. तसेच शहरातील बेरोजगार युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेल्वे बोगी कारखाना उभारून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही आपल्या महायुती सरकारने केलेले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही विकासाच्या प्रवाहात राहण्यासाठी आणि लातूर शहराच्या चौफेर विकासासाठी भाजपा व मित्रपक्षाच्या पाठीशी उभे राहाण्याचे काम करावे, असे आवाहन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते नंदनवन कॉलनी येथील व्यंकटराव नागिमे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी या बैठकीला सूर्यकांतराव शेळके, माजी नगरसेवक सुभाषअप्पा सुलगुडले, दिलीप पाटील, बाबासाहेब कोरे, बालाजी शेळके, प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी, प्रभाकर कदम, लालासाहेब पाटील, गोविंद सोदले, विठ्ठलराव इर्ले, दिगंबर शेटे, नितीन कोरे, चांडक साहेब, लेनेकर, विजय पाटील, औसेकर, मल्लिकार्जून नळगिरे, प्रभूअप्पा खळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, 1987 ते 1993 या कालावधीत बाजार समितीचा सभापती असताना मुंबईसारखे पुणे नंतर लातूरला माथाडी कामगारांसाठी माथाडी बोर्ड लागू करण्याचे काम केले. आज त्यांच्या खात्यावर 200 कोटी रूपये जमा आहेत. यासह इतर सर्व सुविधा देऊन राज्यात तेराव्या क्रमांकावर असलेली लातूर बाजार समिती आज तिसर्या क्रमांकावर आणण्याचे कार्य आपण केलेले आहे. त्यामुळे त्यावेळी 22 लाखावर असलेले बाजार समितीचे उत्पन्न 10 कोटीवर गेलेले आहे. लातूर शहर मतदार संघात आमदार म्हणून काम करताना लातूर शहरासाठी दीडशे कोटीची पाणी पुरवठा योजना सुरू केली. लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसएससी बोर्ड स्थापन केला. याबरोबरच सिटीझन फोरमची जागा शासनाकडे वर्ग करून स्टेडीयम उभारण्याचे कार्य केले. 1996 मध्ये 30 हजार भुकंपग्रस्तांना अनुदान मिळवून दिले. याबरोबरच एक हजार अभियंत्यांना सेवेत कायम केले. परंतु लातूरातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे साडेआठ वर्षे मुख्यमंत्री व तेवीस वर्षे मंत्रीपद असूनही लातूरच्या विकासासाठी एकही उद्योग आणण्याचे काम केलेले नाही. तसेच लातूरकरांचा पाणी प्रश्नही त्यांना मार्गी लावता आलेला नाही. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लातूरकरांसाठी रेल्वे बोगी कारखाना आणून लातूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे या विकासाच्या प्रवाहात कायम राहण्यासाठी भाजपा व मित्रपक्षाला साथ देण्याचे काम आपण करावे, असे आवाहनही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नागिमे परिवाराच्यावतीने माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी या बैठकीला नंदनवन कॉलनी येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदूत्वासाठी काम करणार्या तरुणाच्या पाठीशी उभे रहा – चांडक
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर हे शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव लढा देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये प्रभाग 18 सह शहरातील अनेक प्रभागांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केलेले आहे. शहरातील कुठल्याही नागरिकांचा प्रश्न असेल तर ते पोटतिडकीने मांडून तो प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतात. त्यांनी यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष , भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व आता भाजपा शहर जिल्हाध्यक्ष पदावर कार्य करीत प्रभाग क्र.18 चा चौफेर विकास करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे अजित भैय्या कव्हेकर यांचे हात बळकट करण्यासाठी व हिंदूत्वासाठी काम करणार्या तरुणाच्या पाठीशी आपण सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन नंदनवन कॉलणीतील ज्येष्ठ नागरिक चांडक यांनी केले.
