शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट; पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – आ. धिरज देशमुख

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट; पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - आ. धिरज देशमुख

लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीण मधील अनेक गावात सोयाबीनच्या कोवळ्या मोडांवर गोगलगायींचा हल्ला होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी कृषि विभागाने योग्य त्या उपाययोजना करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच, नुकसानग्रस्त भागात पाहणी करुन तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे केली.

लातूर परिसरात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. यंदा अनेक भागात पाऊस वेळेवर पडल्याने पारंपरिक पद्धती बरोबरच टोकन व बीबीएफ तंत्राचा अवलंब करीत अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीनची उगवणही चांगली आहे. मात्र, गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकरी बांधव चिंतातुर आहेत. याबाबतच्या तक्रारी त्यांनी आमदार धिरज देशमुख यांच्याकडे मांडल्या.

गोगलगायींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही भागात अख्खे वावर गोगलगायींनी फस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागत सोडून गोगलगाय वेचाव्या लागत आहेत. काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करावी व पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार धिरज देशमुख यांनी केली.

About The Author

error: Content is protected !!