भारत समाज भूषण पुरस्काराने मा.खा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा भव्य गौरव
लातूर (प्रतिनिधी)
लातूरचे लोकप्रिय माजी संसदरत्न खासदार, प्राध्यापक, विधिज्ञ डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित “भारत समाज भूषण पुरस्कार २०२६” ने सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग येथिल संस्थेने,छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य स्टार ग्लोबल पुरस्कार वितरण सोहळा आणि किल्ले पर्यटन महोत्सव फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.
या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. एन. खरात यांच्या हस्ते, तसेच प्रसिद्ध अभिनेते दिलीप घेवंदे, अभिनेत्री लिना पंडित, अभिनेते रमेश अग्रवाल, डॉ. मंगल पांचाळ, कृष्ण कुमार दडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. गायकवाड यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ. गायकवाड यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून काम करताना अनेक ऐतिहासिक आणि जनहिताचे निर्णय घेतले. माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीत मोबाईल क्रमांकातील ‘शून्य’ हटविण्याची सूचना करून देशव्यापी बदल घडवून आणला. तसेच लातूरसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, NEET परीक्षा केंद्र, रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, नवीन रेल्वे गाड्यांची सुविधा, राष्ट्रीय महामार्गांची उभारणी, जलयुक्त शिवार अभियान, घरकुल योजना, जनधन योजना, मुद्रा योजना यांसारख्या अनेक विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी केली.
खासदार निधीचा पारदर्शक आणि सर्वसमावेशक वापर करून संपूर्ण मतदारसंघात विकास साधला. हिंदी भाषेच्या प्रसारासाठी देशभर कामकाज केले, तसेच भारत सरकारचे दोन वेळा परदेशात प्रतिनिधित्व करत देशाची प्रतिष्ठा वाढवली.
त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील या सर्वसमावेशक योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या गौरवामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून डॉ. गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार केवळ त्यांच्या कार्याचा सन्मान नसून समाजकारण आणि लोकसेवेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
