नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबधक एस.आर.नाईकवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

पहिल्या यादीत नांव न आल्यामुळे या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी  लवकरच प्रसिध्द होणार

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत दि. 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमीत केलेला आहे.  सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त रु. 50 हजार रुपये पर्यत पात्र लाभार्थींना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षापैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे , अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबधक एस.आर. नाईकवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही पत्रकार परिषद ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक अनंत कस्बे, सहाय्यक निबंधक उमेश पवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर सी.एन. उगीले, नोडल मॅनेजर विजय हरिदास तसेच आदि जिल्ह्यातील संपादक, जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी आदी पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.

लातूर जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह (व्ही-के लिस्ट) पहिली यादी दि.12 ऑक्टोबर, 2022 रोजी प्रसिध्द होणार आहे. पहिल्या यादीत नांव न आल्यामुळे या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी  लवकरच  प्रसिध्द होणार आहे.

विशिष्ट क्रमांकासहची यादी संबंधीत बँका, जिल्हा उपनिबंधक, कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात प्रसिध्दक करण्यात येणार आहेत. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे.

प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्याची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे, अशा प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

About The Author

error: Content is protected !!