भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला यश

भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला यश

लातूर (प्रतिनिधी) : पावसाचा मोठा खंड पडल्याने चालू खरीप हंगामातील सोयाबीन सह इतर पिकाचे मोठे नुकसान मोठे नुकसान होऊन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना भाजप नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेतून विमा संरक्षित पिकांना २५% जोखीम अग्रीम विमा नुकसान भरपाई तात्काळ देण्याची शासनाकडे मागणी करून पाठपुरावा केल्याने येत्या महिनाभरात लातूर जिल्ह्यातील साठ महसुली मंडलातील शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांना २५% जोखीम रक्कम देण्याचा आदेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

    चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन मूग उडीद तूर आधी पिके मोठ्या प्रमाणात घेतली पिके ही जोमात आली होती मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकाची वाढ खुंटली सोयाबीन फूल धरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा ताण बसल्याने ८० ते ९० टक्के पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे ही सत्य परिस्थिती एका पत्रात नमूद करून भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी अडचणीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेतून विमा संरक्षित पिकांना २५% जोखीम अग्रीम विमा नुकसान भरपाई तात्काळ देणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी गेल्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. महसूल मंत्री, मा. कृषीमंत्री, जिल्‍हयाचे मा. पालकमंत्री आणि लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

    पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पावसाचा खंड पाहता  चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षातील सरासरी उत्पादन तुलनेत ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाई च्या २५% मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद शासन निर्णयात असून याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय संयुक्त समिती पंतप्रधान पिक विमा योजना यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येते.

    लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व मंडळात झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ५०% पेक्षा अधिक घट येणार असल्याने ६० महसुली मंडळातील अधिसूचित पीक विमा क्षेत्रातील सोयाबीन अधिसूचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५% आगाव रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे यांना दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी च्या अधिसूचना पत्रानुसार आदेश दिले आहेत.

     विमा कंपनीने महिनाभराच्या आत पात्र ठरलेल्या सोयाबीन या अधिसूचित पिकाकरिता साठ मंडळातील सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई २५% आगाव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असा आदेश देऊन सदर जोखीम विमा क्षेत्रातील सोयाबीन पिक विमाधारक शेतकरी हे हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल असेही शासनाच्या अधिसूचना पत्रात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील साठ महसुली मंडळात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कारेपूर, पोहरेगाव, रेणापूर, पानगाव, पळशी, गातेगाव, कासारखेडा, मुरुड, तांदूळजा, चिंचोली (ब.) या महसुली मंडळाचा समावेश असून आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्या त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अडचणीत सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जोखीम अग्रीम २५% नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आ. कराड यांनी आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

error: Content is protected !!