विजांसह वादळी अवकाळी चा तडाखा, शेतकऱ्यांसोबतच बारा बोलतदारांचे नुकसान

उदगीर (एल.पी.उगीले) अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असे संकेत जरी प्रशासनाच्या वतीने दिले असले तरी संकट कोणत्या स्वरूपात येईल याची नेमकी माहिती नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उदगीर तालुक्यासह बाजूच्या जळकोट तालुक्यातील अतनूर सह परिसरात सायंकाळी सात वाजेपासून विजांच्या कडकडाटात जोरदार वादळी पावसाचा तडाखा देऊन,बालाघाटाच्या पर्वत रांगेत वसलेल्या डोंगरी व अतिदुर्गम भागातील अतनूर पट्ट्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे उन्हाळी व रब्बी हंगामातील पिके वादळी वाऱ्याने आडवी झाली, अवकाळी पावसामुळे कापणी केलेली रब्बीची पिके भिजली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गोरगरिबाचे फ्रिज म्हणून घरोघरी वापरण्यात येणारे नैसर्गिक मातीतून तयार झालेले मटका, माती मिश्रीत मडके याचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तालुका कृषी विभागाकडून नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.
जळकोट तालुक्यातील अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, मुत्तलगाव, धोंडवाडी, घोणसी, तिरुका, हळद वाढवणा, मांजरी, अवलकोंडा, कोदळी, रामपूर, शिवाजीनगर, हळद वडवणा, मरसांगवी, अतनुर तांडा, भवानीनगर, शिवाजीनगर सह परिसरातील २८ गाव,वाडी, तांडा, वस्तीत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यातच अतनूर भागातील २८ वाडी, तांडा, वस्ती, गाव या भागात जोरदार तर तांडा या भागात हलक्या स्वरूपात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान वादळी वाऱ्यात. उन्हाळी मका, भाजीपाला, फळबागांची तसेच केसरी आंबा, रब्बीतील गहू, ज्वारी, बाजरी, केळी पिके आडवी झाली असून नुकसानीची माहिती घेण्यासाठी महसूल व कृषी विभाग सज्ज व्हावे, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या भागाची माहिती देण्याचा सूचना तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक संदीप पाटील यांना दिल्या आहेत. महसूल विभागाकडून अतनूर सज्जाचे तलाठी अतीक शेख यांना सज्ज राहण्याची सूचना तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिल्या असल्याचे समजते.
चौकट……..
आंब्याचे मोठे नुकसान….
जवळपास एक तासभर वादळी वारे या परिसरात थैमान घालत असल्याने या भागातील गावरान आंबे तसेच आंब्याच्या बागा यामधील कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडल्या आहेत. आंब्याच्या व्यापाऱ्यांचे मोठे नकसान झाले असून उन्हाळ्यात आंबा महाग होणार हे संकेत जवळपास निश्चित झाले आहेत.
चौकट…….
ग्रामीण भागात विज गुल……
वादळी वारा आणि पाऊस यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावातून वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्रीची वेळ असल्याने विद्युत महामंडळाकडून वेळीच मदत होऊ शकली नाही. काही ठिकाणी वादळामुळे पोल पडल्याची ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळ्यामध्ये उकाडा होता मात्र अवकाळी पावसामुळे तो उकाडा कमी झाला आहे. मात्र वीज गुल झाल्याने अनेक भागात अडचणी निर्माण झाल्या होत्या.