पदभार स्वीकारताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी रोड रोमियोंना दिला दणका !
लातूर (एल पी उगीले) जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्याचा कार्यभार हाती घेताच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांना भेटी देऊन त्यांच्याकडील कामकाजाची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. सकाळच्या सत्रात पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही शाखांच्या कामकाजाची माहिती व दुपारच्या सत्रातही काही पोलीस ठाण्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची सद्य स्थितीची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
दि. 2 जुलै रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा बरोबरच लातूर शहर उपविभागातील चारही पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पोलीस ठाणे परिसर, तेथील भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक महत्व, गुन्हेगारी परिस्थिती व एकंदर पोलीस कामकाजाची सद्य स्थितीची इत्यंभूत माहिती घेतली.
लातूर शहराला मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी लातूर शहरातील नावाजलेल्या व वर्दळीच्या ट्युशन एरिया परिसरात सायंकाळी 08:00 ते 09:30 वा. च्या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत व शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दिलीप सागर व त्यांचे स्टाफसह ट्युशन एरिया परिसरात पायी पेट्रोलिंग दरम्यान तेथील क्लासेस, हॉस्टेल्स, कॅफे व इतर शैक्षणिक सुविधा पुरवणारे आस्थापनांची इत्यंभूत माहिती घेतली.
तसेच भेटी दरम्यान विद्यार्थी - विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. काहींनी ठराविक एरियात मुलींबरोबर गैरवर्तन होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आवश्यक सूचना केल्या. सूचनाप्रमाणे सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याने ट्युशन एरियामध्ये धडक कारवाई करून विनाकारण थांबून गैरवर्तन करणाऱ्या एकूण 13 मुलाविरुद्ध कारवाई करीत सदर मुलांचे पालकांना बोलावून व मुलांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करून समज देण्यात आलेली आहे.
यापुढेही पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन व नियमित पेट्रोलिंग दरम्यान ट्युशन एरिया मध्ये विनाकारण फिरणाऱ्या व टपोरीगिरी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
