आपल्या आत असलेल्या ‘गुरू’चा आवाज ऐकावा – प्राचार्य डॉ.वसंत बिरादार
आपल्या आत असलेल्या 'गुरू'चा आवाज ऐकावा - प्राचार्य डॉ.वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : माणसाला दोन मनं असतात. बाह्य मन हे त्याला भटकवत असतं. तर अंतर्मन योग्य मार्ग दाखवत असते. अंतर्मन हाच आपला खरा गुरु अ असतो. आपलं भलं व्हावं असं वाटत असेल तर त्याचा आवाज ऐकला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या ‘गुरुगौरव’ सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर प्रमुख पाहुणे डॉ. बब्रुवान मोरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जे सामर्थ्य गुरु जवळ आहे ते देवाजवळही नाही. गुरु मार्ग दाखवत असतो. त्याप्रमाणे चाललं पाहिजे. गुरूंच्या मार्गदर्शनानेच आयुष्याचं सोनं होतं, असंही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पाहुणे डॉ. बब्रुवान मोरे म्हणाले की, भारताला गुरूंची मोठी परंपरा असून, आज जगामध्ये भारताचा नवलौकिक येथील गुरु परंपरेमुळे आहे. आपल्या भाषणातून त्यांनी यावेळी गुरुपौर्णिमेचे महत्त्वही सांगितले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने महा गुरू गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह देऊन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आयक्यूएसी विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना ‘गुरु गौरव’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर ह.भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
